मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. निवडणूक आयोगाने आमच्यावर अन्याय केला असून न्यायासाठी आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.
निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाकडून काढून घेतले. लोकप्रतिनिधींची संख्या कमी असल्याचा ठपका ठेवत, कॉंग्रेसच्या जुन्या निर्णयाचा दाखला देत केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. या निकालावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला असून, यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू असून हा सगळा वाद सुरू असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे.
या वादावर शरद पवार म्हणाले,’सध्या धनुष्यबाणाचा जो वाद सुरू आहे. त्यात मी पडणार नाही, हे मी एकदाच सांगतो,” असे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. शरद पवारांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
त्याआधी हा निकाल लागल्यानंतर शरद पवार यांनी ” एकदा निकाल दिल्यानंतर त्यावर चर्चा होत नसते. त्यामुळे नवे पक्ष नाव आणि चिन्ह घेऊन निवडणूकीला सामोरे जायचे असते. लोक फार तर १५ दिवस महिनाभर चर्चा करतात आणि त्यानंतर नवे निवडणूक चिन्ह स्विकारतात,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.