मुंबई – जागतिक बाजारातून नकारात्मक नकारात्मक संदेश आल्यामुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात धातू आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून होत असलेली विक्री आणि कच्च्या तेलाचे वाढत असलेले दर या कारणामुळे शेअर बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाल्यामुळे दोन दिवसानंतर शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 123 अंकांनी कमी होऊन 60,682 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.21 टक्क्यांनी म्हणजे 36 अंकांनी कमी होऊन 17,856 अंकांवर बंद झाला. एचसीएल टेक कंपनीचा शेअर अडिच टक्क्यांनी कोसळला. टाटा स्टील, आयसीआयसीआय बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, विप्रो, इन्फोसिस, महिंद्रा या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. टाटा मोटर्स, एल अँड टी, भारती एअरटेल, एचडीएफसी, स्टेट बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात दोन टक्क्यापर्यंत वाढ झाल्यामुळे निर्देशांकाची जास्त हाणी टळली.
सरलेला आठवड्यात निर्देशांक स्थिर राहिले तर मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्ये काही प्रमाणात वाढ झाली. गुरुवारी धातू, ऊर्जा क्षेत्राचे निर्देशांक घसरले तर माहिती तंत्रज्ञान, भांडवली वस्तू, आरोग्य आणि रिऍल्टी क्षेत्राच्या निर्देशांकात वाढ झाली असल्याचे कोटक सिक्युरिटी या संस्थेचे विश्लेषक श्रीकांत चव्हाण यांनी सांगितले.
परदेशातील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाल्याची माहिती सकाळी आल्यानंतर भारतीय शेअर बाजारात सकाळपासूनच विक्री चालू होती. जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, जगभरात महागाई अजूनही खात्रीने आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे व्याजदर वाढीची भाषा केली जात आहे.
मंदी जास्त काळ मुक्काम करील असे गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे जागतिक पातळीवर शेअर बाजाराचे निर्देशांक कमी होत आहेत. त्यातच खनिज तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. भारताच्या दृष्टिकोनातून चिंतेची आणखी एक बाब म्हणजे गेल्या अनेक आठवड्यापासून परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात विक्री करीत आहेत. गुरुवारी या गुंतवणूकदारांनी 144 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. नजीकच्या भविष्यातही परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी वाढविण्याची शक्यता नाही.