मुंबई – भारताचा विकास दर आगामी काळात वाढत राहण्याची शक्यता असल्यामुळे आशावादी झालेल्या गुंतवणूकदारांनी निर्देशांक उच्च पातळीवर असतानाही शेअर बाजारात खरेदी चालूच ठेवली. त्यामुळे निर्देशांक नव्या उच्चांकी पातळीवर आगेकूच करीत आहेत.
त्यातच काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीर्घ पल्ल्याचे पायाभूत सुविधा विकसित करण्याचे एकात्मीक धोरण जाहीर केल्यामुळे गुंतवणूकदारांनी गुरुवारी मोठ्या प्रमाणात खरेदी केली असल्याचे दिसून आले. महागाई, औद्योगीक उत्पादनासंबंधातील सकारात्मक आकडेवारीमुळे भारताची स्थूल अर्थ व्यवस्था कमालीची मजबुत असल्याचे स्पष्ट होत आहे.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 568 अंकांनी वाढून 61 हजार अंकाच्या पुढे म्हणजे 61,305 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्ससंबंधातील 30 पैकी 22 कंपन्याच्या शेअरच्या भावात वाढ झाली. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 176 अंकांनी वाढून 18,338 अंकांवर बंद झाला. गेल्या सहा सत्रात सेन्सेक्स 2,116 अंकांनी तर निफ्टी 692 अंकांनी वाढला आहे. बॅंकींग, वित्त, धातू, रिऍल्टी, भांडवली वस्तू या क्षेत्राचे निर्देशांक वाढले.
मोठ्या कंपन्यांबरोबरच छोट्या कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे मिड कॅप 0.54 टक्क्यांनी तर स्मॉल कॅप 0.46 टक्क्यांनी वाढले. वाहन उत्पादकाच्या संघटनेने सप्टेंबर महिन्यात वाहन विक्री कमी झाल्याची आकडेवारी जाहीर केल्यामुळे इतर क्षेत्राचे निर्देशांक वाढले असतानाच वाहन क्षेत्राचा निर्देशांक मात्र आज कमी झाला.
आज सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकांत वाढ झाली. आयटीसी, एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, पावर ग्रीड, इंडसइंड बॅंक या कंपन्यांनी आजच्या तेजीचे नेतृत्व केले तर टीसीएस, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स या कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली.
याबाबत जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, बऱ्याच कंपन्यांनी चांगले ताळेबंद जाहीर केले असताना जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आले. महागाईची आकडेवारी चिंताजनक नाही असे गुंतवणूकदारांना वाटते. यामुळे भारतीय शेअर बाजारात तेजीचे वातावरण कायम आहे.