मुंबई – तीन दिसानंतर शेअर बाजारातील घसरणीला अखेर लगाम लागला. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 503 अंकांनी वाढला व 54,252 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 144 अंकानी वाढून 16,170 अंकावर बंद झाला.
आज 1712 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1509 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 126 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. आज बाजार बंद होताना मेटल, उर्जा, आयटी, रिऍलिटी, बॅंक आणि ऑईल ऍन्ड गॅस या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 1-3 टक्क्यांची वाढ झाली. मिडकॅपमध्ये 1.4 टक्के तर स्मॉल कॅपमध्ये 0.78 टक्क्यांची वाढ झाली.
गेल्या काही दिवसांमध्ये माहिती-तंत्रज्ञान, धातू आणि बॅंकिंग क्षेत्राची बरीच हानी झाली होती. आज गुंतवणूकदारांनी या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी केली असल्याचे दिसून आले. टाटा स्टील, स्टेट बॅंक, एचडीएफसी बॅंक, ऍक्सिस बॅंक, नेस्ले, एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅंक, टीसीएस, विप्रो या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.
मात्र सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्तान युनिलिव्हर, लार्सन अँड टुब्रो, डॉ रेड्डीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. सेन्सेक्स संबंधातील 24 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली असल्याचे दिसून आले. आगामी काळात शेअर बाजार निर्देशांकावर परदेशी गुंतवणूकदारांची विक्री, महागाई आणि रशिया- युक्रेन युद्धाचा परिणाम कायम राहण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान परदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री करीत असतानाच आता काही प्रमाणात देशातील संस्थाजत गुंतवणूकदार खरेदी करण्याची शक्यता काही ब्रोकर्सनी व्यक्त केली. भारत सरकारने महागाई कमी करण्यासाठी इंधनाच्या दरात कपात केली आहे. ही समाधानाची बाब आहे. त्याचबरोबर 31 मे रोजी विकास दराची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. या बाबीकडे गुंतवणूकदारांचे आगामी काळात लक्ष राहणार असल्याचे दिसून येते.