हिंजवडी – सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे माण, मारुंजी, हिंजवडीकर हैराण झाले आहेत. कधी केबलमध्ये बिघाड तर कधी दुरुस्तीच्या नावाखाली बत्ती गुल होत असल्याने हिंजवडीतील विजेची समस्या सुटणार तरी केव्हा, असा प्रश्न आयटीतील कर्मचाऱ्यांसह स्थानिक व्यावसायिक व उद्योजक करत आहेत.
आयटीनगरी म्हणून जगभरात नावलौकिक मिळविलेल्या हिंजवडीत 24 तास सुरळीतपणे वीजपुरवठा करण्यात विद्युत पारेषण व वीज वितरण कंपनीला अपयश आले असल्याचे चित्र आहे. कोरोनानंतर अनेक कंपन्यांतील कर्मचारी आजही घरूनच वर्क फ्रॉम होम आपले काम करत आहेत. त्यांना चोवीस तास विजेची नितांत गरज असते. अनेकांना आपले मोबाइल, इंटरनेट सेवा, संगणक व लॅपटॉप चार्ज करावे लागत असल्याने विजेची आवश्यकता असते. मात्र, आयटीयन्स वास्तव्यास असलेल्या बहुतांश भागात दररोज काही ना काही कारणास्तव बत्ती गुल झालेली असते. परिणामी अनेकांना या समस्येने त्रस्त केले असून, आयटी अभियंते हिंजवडीत वास्तव्यास नकार देऊ लागले आहेत. परिणामी येथील हॉटेल व हॉस्टेल व्यवसाय सर्वाधिक अडचणीत येऊ लागला असल्याचे वास्तव आहे.
सर्वाधिक आयटीयन्स वास्तव्यास असलेल्या लक्ष्मी चौक, मुकाईनगर, येळवंडेवस्ती, मारुंजीरोड भागात बत्ती गुल होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी जुने ट्रान्सफॉर्मर असल्याने त्यांची क्षमता कमी पडू लागली. परिणामी नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी जागेचा प्रश्न उद्भवत असल्याने नवीन ट्रान्सफॉर्मर बसवायचा कुठे असा प्रश्न वीज वितरणपुढे
उभा आहे.
शनिवारी विद्युत पारेषण कंपनीने दिवसभरासाठी वीजपुरवठा खंडित करण्याचा परवाना घेतला होता. याच दरम्यान आम्ही काही खांब स्थलांतरित करण्याचे काम हाती घेतल्याने काही काळ विद्युतपुरवठा खंडित झाला होता. परंतु सायंकाळी सर्व पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. – टी. एच. पठाण, सहाय्यक अभियंता.
हिंजवडीतील सर्वच भागात नागरीकरण वेगाने वाढत आहे. जुन्या तारा, खांब व ट्रान्सफॉर्मरवर ताण येऊ लागला आहे. काही ठिकाणी केबल नादुरुस्त होतात. त्यामुळे वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु वाढता लोड लक्षात घेता महावितरण कंपनीने जुने ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविली पाहिजे. तसेच पीएमआरडीएने त्यांच्या कडील अमेनिटी स्पेस विजेचे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी ग्रामपंचायतीला हस्तांतरित केल्या पाहिजेत.
– सचिन जांभुळकर, सरपंच, हिंजवडी