नवी दिल्ली – जागतिक बाजारात सध्या इंधनाचे दर कमी आहेत. मात्र भारतातील पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनाचे दर त्या प्रमाणात कमी झाले नसल्यामुळे ग्राहकांमध्ये असमाधान व्यक्त केले जात आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, आपण ही पेट्रोलचे दर कमी होण्याबाबत आशावादी आहोत.
कॉंग्रेसकडून सशस्त्र दलांचा अपमान; भाजपची टीका
मात्र इंधन कंपन्यांचा यापूर्वी झालेला तोटा जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत इंधन कंपन्या पेट्रोलच्या दरात कपात करण्याची शक्यता कमी आहे असे बोलले जाते. कंपन्यांचा नफा लवकरच सुरू होईल आणि कंपन्या इंधनाच्या दरात घट करतील असे सिंग यांनी सांगितले. पेट्रोल आणि डिझेलचे दर जागतिक दराप्रमाणे रोज कमी जास्त करणे अपेक्षित आहे. मात्र इंडियन ऑइल कार्पोरेशन, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन या भारतातील तीन मोठ्या इंधन कंपन्यांनी गेल्या 15 महिन्यापासून इंधनाच्या दरात कसलीही वाढ किंवा घट केलेली नाही.
यासंदर्भात विश्लेषकांनी सांगितले की, जागतिक बाजारात इंधनाचे दर कमी झाल्यामुळे पेट्रोलच्या विक्रीत भारतातील इंधन कंपन्यांना नफा होत आहे. मात्र डिझेलमध्ये आणखी त्यांना तोटा होत आहे. एकेकाळी इंधन कंपन्यांना पेट्रोल विक्रीत प्रति लिटरला दहा रुपयाचा तर डिझेल विक्रीत प्रति लिटरला 13 रुपयाचा तोटा होत होता. आता पेट्रोल विक्रीत कंपन्यांना नफा होत आहे. मात्र डिझेल विक्रीमध्ये अजूनही काही प्रमाणात तोटा होत आहे. गेल्या 15 महिन्यांत भारतातील इंधन कंपन्यांनी इंधनाच्या दरात बदल केलेला नाही. त्यामुळे भारतातील महागाई वेगाने कमी होण्यास मदत मिळाली आहे.
त्यामुळे इंधन कंपन्या या विषयावर विचार करीत असतील असे सिंह यांनी सांगितले. काही महिन्यापूर्वी जागतिक बाजारात इंधनाच्या किमती 140 डॉलरपर्यंत गेल्या होत्या. मात्र आता त्या 85 डॉलरपर्यंत खाली आल्या आहेत. मात्र दरम्यानच्या काळात पेट्रोल कंपन्यांना तोटा झाला आहे. तो तोटा भरून काढण्यासाठी या कंपन्या प्रयत्न करीत आहेत.
हा तोटा भरून निघावा यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाकडे अनेकदा मागणी केलेली आहे. मात्र फक्त स्वयंपाकाच्या गॅसच्या विक्रीत झालेला तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना आतापर्यंत 18 हजार कोटी रुपयांची रक्कम दिलेली आहे. जर हा तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने मदत केली तर इंधन कंपन्या तात्काळ इंधनाच्या दरात कपात करू शकतात असे समजले जाते.