जयपूर : राजस्थानमध्ये गेल्या चार वर्षांत अभूतपूर्व काम झाले आहे, इतका विकास देशातील अन्य कोणत्याही राज्यात झालेला नाही. हीच बाब विरोधकांना पचवता येत नसल्याने ते अनावश्यक मुद्दे उपस्थित करून सभागृहात गोंधळ घालत आहेत, असे प्रतिपादन संसदीय कामकाज मंत्री शांती धारीवाल यांनी केले.
आजपासून सुरू झालेल्या राजस्थान विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी घोषणाबाजी आणि गोंधळ घातल्याबद्दल धारीवाल यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
राज्यपाल कलराज मिश्रा सभागृहात भाषणातून सरकारच्या चार वर्षातील कामगिरी सांगत होते, पण विरोधकांनी त्यांचे ऐकायचे नाही आणि गोंधळ घालायला सुरुवात केली. पेपरफुटी प्रकरणाबाबत विरोधी पक्षाचे लोक गोंधळ घालत होते, परंतु त्यांना हे माहित असले पाहिजे की, या प्रकरणात अटक देखील झाली आहे आणि या प्रकरणाची चौकशी केली जात आहे, याकडे धारीवाल यांनी लक्ष वेधले.
भाजपशासित राज्यांचा हवाला देत धारीवाल म्हणाले की, भाजपशासित राज्यांमध्ये यापूर्वी अनेक पेपर लीक झाले आहेत, परंतु आजपर्यंत एकाही गुन्हेगाराला पकडले गेले नाही. गेहलोत सरकारने पेपर लीक प्रकरणी तातडीने कारवाई करत आरोपींना तुरुंगात टाकले आहे. राजस्थानमध्ये गेल्या 4 वर्षात केलेल्या कामांमुळे भाजपला हेवा वाटतो, असेही धारीवाल म्हणाले.
‘गर्भधारणा चालू ठेवायची की नाही, हा अधिकार ‘त्या’ महिलेलाच! मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
दुसरीकडे, पेपर लीक प्रकरणावर सचिन पायलट यांनी दिलेल्या वक्तव्यावर शांती धारीवाल यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असून जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. आतापर्यंतच्या तपासात जे काही आढळून आले त्यावर कारवाई करण्यात आली असून, आरोपींची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे.