पिंपरी – रावेत परिसरात पवना नदीपात्रातील पाणी दुर्गंधीयुक्त व दूषित झाले आहे. या पाण्यावर मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. याच नदीपात्रातील पाणी शहरवासीयांची तहान भागवत आहे. नदीचे आरोग्य सुदृढ राहिले तरच शहरवासीयांचे आरोग्य सुदृढ राहील. त्यामुळे नदीच्या स्वच्छतेबाबत महापालिकेने उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिक व पर्यावरणप्रेमी करत आहेत.
पवना नदीपात्र आणि त्याच्या प्रदूषणाची पातळी पाहता दिवसेंदिवस नदीच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. या नदीचे पावित्र्य, वाढत जाणारे प्रदूषण यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. मावळात उगम होणाऱ्या या नदीचा प्रवास शहराच्या हद्दीतून दापोडीपर्यंतच्या संगमापर्यंत आहे. या प्रवासादरम्यान पाण्याच्या प्रदूषण पातळीत वाढ तर नदी पात्राची रुंदी कमी होताना दिसते. तर, गेल्या सुमारे आठ दिवसांपासून या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साठली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जलपर्णी काढण्यात येत आहे. मात्र, नदीपात्र पुन्हा दुसऱ्या दिवशी जलपर्णीने पूर्ण अच्छादलेली असते. तसेच सध्या नदीपात्रातील पाणी पाहिले असता पूर्ण प्रदूषित दिसून येत असून हे नक्की नदीपात्र आहे की, गटार अशी स्थिती सध्या आहे. रावेत येथील बास्केट ब्रिज ते पुढे चिंचवड गावापर्यंत पाणी काळे, दूषित दिसत आहे. या पात्रात ठिकठिकाणी नाल्यातील गाळयुक्त व रसायनमिश्रित पाणी सोडले जात आहे. रावेत येथील पाटील घाट परिसरात दोन-तीन ठिकाणी नाल्यातील पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे या ठिकाणी पाणी अधिक प्रदूषित दिसून येत आहे. तसेच नदीपात्रात विविध प्रकारच्या वस्तू, साहित्य टाकले जात आहे. त्यामुळे अनेकदा ही नदी आहे का? असा प्रश्न पडतो.
जलपर्णी एक कोडे?
सध्या पवना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सर्वत्रच जलपर्णी दिसत आहे. प्रत्येक वर्षी जलपर्णी काढली जाते. मात्र, पुन्हा ती “जैसे थे’च असते. त्यामुळे पवना नदीपात्रातील जलपर्णी एक कोडे झाले आहे. वारंवार ती काढल्याचा दावा होतो. मात्री, पुन्हा दुसऱ्या दिवशी नदीपात्रात तशीच राहते. अनेकदा मोठा पाऊस झाल्यास ती पुढे वाहून जाते. मात्र, आठ-दहा दिवसांत ती पुन्हा दिसू लागते. त्यामुळे पुन्हा जलपर्णी होऊच नये म्हणून महापालिकेने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात
मागील आठवड्यात नदीपात्रात मृत मासे आढळून आले. परिणामी नदीपात्रातील जलचर प्राण्यांच्या अस्तित्वाचा पुन्हा एकदा धोका सिद्ध झाला आहे. त्यामुळे प्रदूषण होऊ नये, यासाठी उपायोजना करण्याची गरज आहे. पाणी प्रदूषित होते. प्रदूषित पाण्यामुळे जलचर प्राण्यांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे.