सातारा – सातारा पालिकेकडून चतुर्थ वार्षिक कर आकारणी प्रक्रिया सुरु करण्यात आली असून या प्रक्रियेला आम्ही सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. यासंदर्भात कालच मुंबई येथे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून पालिकेची निवडणूक झाल्याशिवाय कोणताही निर्णय होऊ नये, या प्रक्रियेला स्थगिती द्यावी अशी मागणी त्यांच्याकडे केली. यांनतर ना. शिंदे यांनी लगेच पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना प्रक्रिया थांबवण्याच्या सूचना केल्या आहेत. नागरिकांच्या हितासाठी साताऱ्यात अन्यायकारक घरपट्टी वाढ होऊ देणार नाही, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या विशेष प्रयत्नांतून शाहूनगर गोळीबार मैदान येथील सारंग कॉलनीतील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण (5 लक्ष) आणि साई कॉलनी येथे दत्त मंदिरासमोर सभामंडप उभारणे (15 लक्ष) या कामांसाठी निधी उपलब्ध झाला असून या कामांचे भूमिपूजन आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक शेखर मोरे-पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य आशुतोष चव्हाण, फिरोज पठाण, रवी पवार, प्रकाश घाडगे, गणेश निकम, नाना चव्हाण, भालचंद्र गोताड, आप्पा पिसाळ, आबा जगताप, बाळासाहेब महामूलकर, युवराज जाधव, पूनम निकम, रुपाली घाडगे, विजया क्षिरसागर, विद्या चव्हाण, वनिता कण्हेरकर, किर्वे, उषा पवार, सुवर्णा कणसे, मोहन घाडगे, बंटी सुर्वे, सोनाली मोरे, मोनाली मोरे, अमोल नलवडे, नीतीराज सूर्यवंशी, प्रकाश घुले, संतोष घुले, पप्पू घोरपडे यांच्यासह नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शाहूनगर, विलासपूरसाठी नवीन पाणी पुरवठा योजना
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, शाहूनगर आणि विलासपूर येथील पाणीप्रश्न संपुष्टात आणण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली आहे. पुढील 50 वर्षांचा विचार करून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. या भागातील प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी आपण नेहमीच प्राधान्य दिले आहे.
यावेळी महिलांनी घरपट्टी वाढीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मी आणि माझे सर्व सहकारी या प्रश्नावर लक्ष ठेवून आहोत. अन्यायकारक घरपट्टी वाढ होणार नाही यासाठी आम्ही सतर्क आहोत. कालच मुंबई येथे मुख्यमंत्री ना. शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. घरपट्टी वाढीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी जी कमिटी असते, ती पालिकेच्या निवडणुकीनंतर गठीत होईल आणि मगच वाढीबाबत निर्णय होईल. त्यामुळे चालू प्रक्रियेकला स्थगिती द्या, अशी मागणी ना. शिंदे यांच्याकडे केली. त्यांनीही तात्काळ दूरध्वनीवरून पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना याबाबत सूचना करून प्रक्रिया थांबविण्यास सांगितले आहे. नागरिकांवर अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.