मांजरी (विवेकानंद काटमोरे) -पुणे महापालिकेच्या पूर्वेकडील परिसरासाठी स्वतंत्र महापालिका हवी, अशी आग्रही मागणी अनेक वर्षांपासून केली जात असताना महापालिकेत समाविष्ट 34 गावांपैकी केवळ फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावे पुन्हा वगळून स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यामुळे एक-दोन गावांची नगरपालिका करण्यापेक्षा समाविष्ट पूर्व हवेलीतील गावांसाठी स्वतंत्र महापालिकाच करावी, अशी मागणी पुन्हा उफाळून आली आहे.
पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील मालमत्ता कर व मूलभूत सोयी सुविधांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा शासकीय निवासस्थानी मंगळवारी (दि.6) बैठक झाली. मात्र, यामध्ये अन्य विषय बाजूला राहून फुरसुंगी आणि उरूळी देवाची या दोन गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यावर शिक्का मोर्तब करण्यात आले. यामुळे पूर्व हवेलीतील अन्य समाविष्ट गावांतील अनेक मान्यवरांनी याबाबत तिव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत करायची तर “नवी हडपसर’ महापालिकाच करा, अशी मागणी केली.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयानंतर स्वरूपाच्या संमिश्र प्रतिक्रिया पूर्व हवेलीतील अन्य गावांसह हडपसर भागातील नागरिकांनी व्यक्त केल्या. हडपसर, मुंढवा, केशवनगर, वाघोली, मांजरी, शेवाळेवाडी, लोणीकाळभोर, उंड्री, पिसोळी यासह फुरसुंगी, देवाची उरूळी, वडकी या परिसराच्या नागरिकरणाचा वेग पाहता यासाठी आणखी एक महापालिका होणे अत्यंत संयुक्त असल्याची मागणी वारंवार केली जात आहे. परंतु, याबाबत केवळ लोकसभा, विधासभा आणि महापालिका निवडणुकीचे राजकीय मुद्दे विचारात घेत हडपसर नवी महापालिका करण्याचा विषय टाळला जात आहे.
हडपसर महापालिका अस्तित्वात आणण्याऐवजी फक्त दोन गावांचा विचार करणे योग्य नाही. हा निर्णय इतर गावांवर अन्याय करणारा ठरणार आहे, असे एक सामान्य नागरिक व सामाजिक कार्यकर्ता म्हणून वाटते आहे.
– सोमनाथ काशिद
हडपसर ते उरुळी कांचन पर्यंतच्या पूर्व भागाची स्वतंत्र महानगरपालिका झाली पाहिजे. याबाबत अनेकदा मागणी झालेली आहे. राजकारणातून चुकीचे निर्णय होत असतील तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागेल.
– ऍड. अमित शेवाळे
राज्य सरकारने नव्याने समावेश केलेल्या व पूर्व भागातील काही गावांची मिळून स्वतंत्र महापालिका निर्माण करावी, जेणेकरून या गावांचा नियोजनबद्ध विकास होऊ शकतो. नागरिकांना मूलभूत त्यांच्या हक्काच्या सोयी सुविधा मिळू शकतील.
– राहुल शेवाळे
स्थानिक राजकीय गुलामगिरीतून गावे मुक्त झाली आहेत. महापालिकेतच या गावांचा नियोजनबद्ध विकास होऊ शकतो. त्यामुळे नगरपरिषद करा, ही मागणी हास्यास्पद आहे. सर्वांगिण विकासाच्या दृष्टिने स्वतंत्र महापालिका हा निर्णय योग्य ठरू शकतो.
– शैलेंद्र बेल्हेकर
महापालिकेत 1995 मध्ये विमाननगर, खराडी, कल्याणी नगर, वडगाव शेरी हा भाग समाविष्ट राहिला तर काह गावे बाहेर पडली. समाविष्ट भागाचा सर्वांगिण विकास झाला. सुदैवाने आपल्याकडे फारशी बकाल वस्ती झालेली नाही. महापालिकेमध्ये समावेश ही एक संधीच आहे. – विक्रम शेवाळे
मुख्यमंत्र्यांनी कायदेशीर मत विचारात न घेता स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय घेतला आहे. खरंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने सदरची गावे समाविष्ट झाली. परंतु, राजकीय सोयीने बदल होत आहेत. जनहित याचिका दाखल करावी लागणार आहे.
– राजेंद्र साळवे
नगरपालिकांची संख्या वाढविण्यापेक्षा पूर्व हवेलीतील गावांची मिळून एकत्र महापालिका अस्तित्वात आणणे योग्य ठरणार आहे. अश्या छोट्या नगरपालिका करण्यापेक्षा हडपसर ही एकच महापालिका करणे हे योग्य राहील.
– वामन भुरे