अहमदाबाद – कोणत्याही पक्षाला देशाच्या कोणत्याही भागात जाऊन निवडणुका लढवायचा अधिकार आहे पण त्या पक्षाला स्वीकारायचे किंवा नाही याचा निर्णय त्या राज्यातील जनता घेत असते. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला एखादीही जागा जिंकता येणे अवघड वाटते आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ते म्हणाले की, आम आदमी पक्षाने दिलेली आश्वासने अर्थसंकल्पाच्याही क्षमतेपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे ती अंमलात येणे अशक्य आहे. त्यामुळे हा पक्ष गुजरातमधील लोकांच्या विचारातच नाही असे ते म्हणाले.
सरकारी तपास यंत्रणांचा राजकीय दुरूपयोग केला जात असल्याचा आरोप सुरू आहे. त्या विषयी विचारले असता शहा म्हणाले की, देशात निष्पक्ष न्यायव्यवस्था अस्तित्वात आहे. ज्यांना या कारवाईवर शंका आहे त्यांनी कोर्टात जाऊन या कारवाईला आव्हान द्यावे. देशात धार्मिक कट्टरतेला आळा घालण्याची गरज आहे असे मतही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला.
मोदी सरकारचे दहशतवादाविषयीचे धोरण झिरो टॉलरन्सचे आहे, असेही ते म्हणाले. गुजरातच्या प्रचारात राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचा का वापर केला जात आहे असे विचारता ते म्हणाले की, गुजरातची सुरक्षा देशाच्या सुरक्षेशी जोडली गेली आहे त्यामुळे गुजरातची सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा हे वेगळे विषय नाहीत.
देशातील वाढत्या महागाईच्या संबंधात बोलताना ते म्हणाले की, महागाईचे संकट जागतिक स्वरूपाचे आहे. तथापि, भारतावर त्याचा अत्यंत अल्प परिणाम झालेला आहे. तरीही महागाईचा विषय परिणामकारकपणे हाताळला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.