भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातही राजकारण आणखी तापले आहे. प्रतापगड किल्ल्यावर आयोजित शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमानिमित्त बोलताना भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीतील सुटकेशी केल्यामुळे आता एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
वाचाळवीरांना आवरा, मंत्री लोढांच्या वक्तव्यावरुन अजित पवार भडकले; म्हणाले ” हे कधी… “
मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया
पर्यटन मंत्र्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मुख्यमंत्र्यांवरही टीका होऊ लागली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,”मंगलप्रभात लोढा यांना मी पहिल्यांदा धन्यवाद देतो त्यांनी प्रतापगडासाठी २५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर लोढा यांनी स्वतःच दिले स्पष्टीकरण, म्हणाले…
अजित पवारांनी लोढा यांना खडसावले
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगल प्रभात लोढा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून संताप व्यक्त केला. ते म्हणाले की,”वाचाळवीरांना आवरा असे मी सातत्याने सांगतो आहे. तरी देखील यांच्या मनामध्ये काहीना काही कल्पना अशा येतात ते बोलायला एक जातात आणि त्यातून अर्थ वेगळा निघतो. साधी एक भूमिका देखील या लोकांना कळत नाही. एखाद्याला ठेच लागली की दुसरा ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करत असतो हे तर यांच्यात दिसतचं नाही. उलट चढाओढ लागलेली दिसते.”
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्टेजवर असातानाच त्यांच्या देखतच तुलना केली. आपण कोणाशी तुलना करतोय, काय करतोय आपल्याला जबाबादरी काय, आपण कसे बोलले पाहिजे, कसे वागले पाहिजे याचा विचार करावा. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाशी होऊ शकते का? हे महाराष्ट्रात कधी घडलंय का? याचेही तारतम्य या लोकांना राहिले नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणुका लागू दे…जनता यांना योग्य जागा दाखवेल”, असेही ते म्हणाले.
काय म्हणाले होते नेमकं लोढा
भाजप नेते आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली. प्रतापगडावर ‘शिवप्रताप’ दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना डांबून ठेवले होते परंतु स्वराज्यासाठी ते बाहेर पडले आणि देशात स्वराज्याची स्थापना करू शकले… तसेच मुख्यमंत्री शिंदेंना देखील रोखण्याचे प्रयत्न झाले परंतु महाराष्ट्रासाठी ते देखील बाहेर पडले म्हणून आज उल्हास आहे”.