हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारक वर्षानुवर्षे उपेक्षितच
रामचंद्र सोनवणे
राजगुरुनगर : येथील थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारक वर्षानुवर्षे दुर्लक्षित होत आहे. या हुतात्म्याच्या जन्मस्थळ स्मारकासाठी शासन दरबारी निधी मिळत नाही. त्यामुळे थोर क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू यांच्या पदरी अजूनही उपेक्षाच आहे.
भारतीय स्वातंत्रय लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळ राष्ट्रीय जन्मस्थळ स्मारकाच्या कामाला निधीच मिळत नसल्याने आणि या स्मारकाकडे आतापर्यंत झालेल्या मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी पाठ फिरवल्याने हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकाचे काम पूर्णत्वास गेले नाही. ऑगस्ट महिन्यात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथील स्मारकाला भेट दिली होती. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात त्यांनी या स्मारकासाठी भरीव निधीची तरतूद केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर नुकतेच मुंबई येथे हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिमाखात झाले; मात्र राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळ स्मारकासाठी कोणतीच घोषणा झाली नाही. येथील स्मारकाच्या कामासाठी शासनाची तिजोरी खाली आहे का, असा सवाल राजगुरूप्रेमी व राजगुरूनगरकर करीत आहेत.
वर्षामागून वर्षे सरत आहेत. निवडणुकांमागून निवडणुका होत आहेत. निवडून आलेले मंत्री, बदली झालेले प्रशासकीय अधिकारी केवळ आश्वासनांची खैरात करीत आहेत; मात्र भरीव निधीची तरतूद होत नाही. गेली दहा वर्षांपासून या महान देशभक्ताच्या जन्मस्थळाचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्यासाठी आराखड्यामागून आराखडे झाले. हे आराखडे शासनाच्या लालफितीत धूळखात पडून आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली तरी या थोर क्रांतीकारकांची स्वातंत्र्यानंतर उपेक्षाच झाली आहे. या राष्ट्रीय स्मारकाला कधी निधी मिळणार, हा मोठा प्रश्न सर्वांना सतावत आहे. उदासीन शासन, अकार्यक्षम प्रशासन आणि मतांचे राजकारण करणारे तालुक्यातील नेते अनभिज्ञ अशी परिस्थिती हुतात्मा राजगुरू राष्ट्रीय स्मारकाच्या बाबत बनली आहे.
नागरिकांकडून खंत
या जन्मस्थळ वाड्यात हुतात्मा राजगुरू यांची जन्मस्थळ खोली, थोरला वाडा आणि त्यातील देवघर, व्यायाम खोली, अभ्यासाच्या खोलीचे काम झाले आहे. शासनाकडून भरीव तरतूद होत नसल्याने देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकाचे सुशोभीकरण, अतिक्रमणे हटविणे, परिसराचा विकास आणि अत्याधुनिक सेवा सुविधा करता येत नाहीत. या राष्ट्रीय स्मारकासाठी राज्य आणि केंद्र शासन पातळीवर याचा पाठ्पुरावा होत नसल्याने या जन्मस्थळास भरीव तरतूद होत नाही, अशी नागरिक खंत व्यक्त करीत आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात मुहूर्त मिळणार का?
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना यावर्षी तरी शिंदे सरकार राजगुरूनगर येथील थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकास भरीव निधीची तरतूद करणार का? याकडे राजगुरूनगर शहरासह तालुक्यातील नागरिकांचे व देशभरातील हुतात्मा राजगुरू प्रेमींचे लक्ष लागले आहे.