नगर – राज्य परिवहन महामंडळाने 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेत नगर जिल्ह्यात मात्र अडचणी वाढल्या आहेत. कार्ड नोंदणीसाठी मुदतवाढ मिळालेली असताना येथे मात्र नोंदणीत तांत्रिक अडचणी येत आहेत. आगार पातळीवर तब्बल 10 हजार 244 स्मार्ट कार्ड धूळखात पडले आहेत. खासगी संस्थांनी किती कार्ड नोंदणी केली, किती लोकांना कार्ड दिले याची माहिती येथे उपलब्ध नसल्याचे दिसून आले.
दरम्यान, नगर विभागाने आतापर्यंत 71 हजार 283 स्मार्ट कार्ड वाटप केले आहे. ज्येष्ठ नागरिकांसह अन्य प्रवास सवलतींसाठी स्मार्ट कार्ड दिले जात आहे. यासाठी आगार पातळीवर नोंदणी केली जात आहे. सध्या या कार्यवाहीत अडचणी येत आहेत.
सध्या विद्यार्थ्यांसाठी नोंदणी बंद असल्याचीही माहिती मिळाली. ज्येष्ठ नागरिकांसाठी नोंदणी सुरू आहे मात्र त्यातही अडचणी येत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. या योजनेत प्रवाशांना डिजिटल स्वरुपात कार्ड देण्यात येत आहे. त्यामुळे कागदी पास सांभाळण्याचा त्रास वाचला आहे. कार्ड रिचार्ज करण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे कार्ड आधारकार्डशी संलग्न करण्यात येणार आहे. त्यामुळे जन्म तारखेवरून प्रवासी व वाहकांत नेहमी होणारे वाद टळण्यास मदत होणार आहे. तसेच कार्ड डिजिटल स्वरुपात असल्याने यामध्ये फेरफार होण्याचीही शक्यता नाही.
राज्यात अजूनही एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रवाशांना या कार्डच फायदा होणार आहे. त्यासाठी प्रवाशांकडून प्रतिसादही मिळत आहे. मात्र, बऱ्याचदा नावनोंदणीत तांत्रिक अडचणी येत आहेत. काही वेळेस तर नोंदणी बंदही करावी लागते. तसेच खासगी केंद्रांकडूनही नोंदणी करावी लागते. या ठिकाणी तर ज्येष्ठ नागरिकांना जास्तच त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे महामंडळाने या पद्धतीत सुधारणा करण्याची गरज प्रवाशांनी व्यक्त केली आहे. आता नावनोंदणीसाठी आणखी मुदतवाढ मिळाली आहे. यामध्ये येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी महामंडळाकडूनही प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आगामी काळात यातील अडचणी कमी होऊन प्रवाशांचाही त्रास कमी होण्याची शक्यता अधिकारी व्यक्त करत आहेत.
आगारनिहाय कार्डवाटप
(कंसात शिल्लक संख्या)
तारकपूर – 11059 (2257), शेवगाव – 5504 (483), जामखेड – 7671 (346), श्रीरामपूर 4339 (1094), कोपरगाव – 7236 (1733), पारनेर 4294 (709), संगमनेर 6450 (1180), श्रीगोंदा – 9584 (994), नेवासा 4488 (327), पाथर्डी – 3682 (622), अकोले – 6976 (499)
दहा हजार कार्ड धूळ खात
स्मार्ट कार्ड आल्यानंतर त्याचे प्रवाशांना वाटप केले जाते. जिल्ह्यातील आगारांनी ऑगस्ट 2022 पर्यंत 81 हजार 500 प्रवाशांची स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली. त्यापैकी 71 हजार 283 कार्ड वाटप करण्यात आले. अद्याप 10 हजार 244 कार्ड वाटप केलेले नाहीत. हे आगारातच पडून आहेत. हे कार्ड घेऊन जाण्याचे आवाहन विभागाने संबंधित नागरिकांना केले आहे.