पुणे – मुंबईसह काही भागांत गोवर आजार पसरला आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून जनजागृती सुरू करण्यात आली आहे.
गोवर विषाणू रुग्णांच्या खोकल्याद्वारे हवेमार्फत पसरतो व संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या श्वसन संस्थेतून शरीरात प्रवेश करतो. या रोगाची लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा व काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
यात प्रामुख्याने ताप येणे, शरीरावर लाल पुरळ येणे, डोळे लाल होणे, गोव्याची लक्षणे आहेत. गोवरच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते दहा दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होतात. सुरुवातीस ताप व खोकला, सर्दी, डोळे लाल होणे यापैकी एक-दोन किंवा तीनही लक्षणे असू शकतात.
दोन-चार दिवसानंतर सर्व अंगावर पुरळ येणे, ते कानाच्या मागे, चेहरा, छाती, पोटावर पसरतात. त्यामुळे वेळीच काळजी घेऊन संभाव्य धोके टाळता येऊ शकतात, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.