महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या कालावधीमध्ये काही माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्राच्या राजकारणात आलेली कटुता कमी करण्याची गरज व्यक्त केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मुखपत्रात देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाची दखल घेऊन राजकारणातील कटुता संपवण्यासाठी फडणवीस यांनीच पुढाकार घ्यावा, अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले होते.
माध्यमांनी या घटनेचे वर्णन उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकत्र येण्यासाठी दिलेली साथ अशा प्रकारे केले असले, तरी त्याला कोणताही अर्थ नाही. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या कटुता संपवण्याच्या विधानाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ज्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे तो उपहासात्मक असून महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता निर्माण करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा भाजप हाच पक्ष जबाबदार असल्याचे अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सूचित केले आहे आणि ही जर कटुता संपवायची असेल, तर भाजपानेच पुढाकार घ्यायला हवा, असे त्यांनी उपहासानेच सुचवले आहे. अर्थात, काहीही जरी असले तरी गेल्या काही कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता आली आहे ती निश्चितच महाराष्ट्रासारख्या सांस्कृतिक राज्याला भूषणावह नाही.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 50 पेक्षा जास्त आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडायचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर ज्या प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत त्यामुळेच ही कटुता जास्त प्रमाणात वाढली आहे. खरे तर एखाद्या राजकीय पक्षातून फूट पडून दुसरा एखादा गट निर्माण करणे किंवा आमदारांनी दुसऱ्या पक्षात जाणे हे भारतीय राजकारणासाठी त्यातही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी फारसे नवे नाही. आतापर्यंत अशा घटना जेव्हा जेव्हा घडल्या त्यानंतर ज्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आला होत्या त्या प्रतिक्रियांच्या तुलनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया अतिशय तीव्र स्वरूपाच्या असल्यानेच ही कटुता वाढत चालली आहे. देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या कॉंग्रेसने आतापर्यंत अनेक फुटी अनुभवलेल्या आहेत. देशातील बहुतेक सर्व राजकीय पक्ष कधी ना कधी पूर्वी कॉंग्रेस पक्षाशी संबंधित होते. एखादा गट कॉंग्रेस पक्षामधून बाहेर पडला म्हणून कॉंग्रेसने फार मोठा कांगावा केलाय किंवा कटू प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, असे आतापर्यंत झालेले नाही. कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या ममता बॅनर्जी यांचा तृणमूल कॉंग्रेस असो किंवा शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष असो दोन्ही पक्ष विकसित झाले आहेत आणि सध्या या पक्षाबाबत कॉंग्रेसच्या मनात कोणतीही कटुता नाही; पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्या गटाबाबत जी कटुता बाळगली आहे त्यामुळेच सध्याची ही परिस्थिती समोर आली आहे. अडीच ते तीन वर्षांपूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे यांनी भाजपशी काडीमोड घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्यासोबत संसार थाटला होता तेव्हासुद्धा भाजपकडून कटू प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. सध्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील 50 आमदारांची संभावना नेहमीच गद्दार फुटीर आणि खोकेवाले अशाप्रकारे होत असल्यामुळे ही कटुता कोणत्या थराला गेली आहे हे लक्षात येते.
शिवसेनेत यापूर्वीही छगन भुजबळ यांच्या निमित्ताने किंवा नंतर राज ठाकरे यांच्या निमित्ताने फूट पडली होती; पण तेव्हा तेवढ्या प्रमाणात कटुता बाळगण्यात आली नव्हती. अर्थात, छगन भुजबळ यांच्यासोबत जे आमदार बाहेर पडले होते त्यांचीही संभावना त्या काळात गद्दार अशीच करण्यात आली होती आणि छगन भुजबळ यांची संभावना ही बाळासाहेब ठाकरे नेहमीच लखोबा अशी करत असत. नंतरच्या काळात ते वातावरण निवळले होते. पण महाराष्ट्रातील विद्यमान वातावरण मात्र एवढे कटू झाले आहे की, ते कधी निवळेल याबाबत कोणताही अंदाज करणे सध्या शक्य नाही. राज्यातील सध्याचे राजकारण हा क्रिया-प्रतिक्रियांचा खेळ झाला असल्याने एखाद्या राजकीय नेत्याने व्यक्त केलेल्या मतावर दुसरे नेते त्याच तीव्रतेने कटू प्रतिक्रिया व्यक्त करण्यातच धन्यता मानत असल्याने ही कटुता वाढत चालली आहे. साहजिकच ही कटुता संपवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनाच करावे लागेल, ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भावना जर प्रामाणिक आणि खरी असेल तर खरे तर या दोन्ही नेत्यांनी ही कटुता संपवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये भाजपने आपल्या अनेक नेत्यांना प्रतिक्रिया व्यक्त करण्याबाबत काही नियंत्रणे घातली होती. अनेक नेत्यांना बोलू नका अशा सूचना देण्यात आल्या होत्या. कटुता संपवायची असेल तर भाजप आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोन्ही पक्षातील नेत्यांनी आपल्या प्रमुख नेत्यांना काय बोलावे याबाबत मार्गदर्शक सूचना देण्याची गरज आहे.
जाहीर व्यासपीठावर उपस्थित लोकांच्या टाळ्या घेण्यासाठी जर आपण एखादे विधान करत असू तर त्यातून विचित्र प्रतिक्रिया उमटू शकतात हे सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असलेले अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांची संभावना ज्याप्रमाणे दुसरा पप्पू अशी केली आहे त्यामुळे व्यासपीठावरून जरी टाळ्या मिळाल्या असल्या तरी कटुता वाढण्यामध्ये अशा प्रकारची विधाने हातभारच लावतात, हे विसरून चालणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत आलेल्या फायर ब्रॅंड नेत्या सुषमा अंधारेसुद्धा आता बोलण्याच्या भरात अशीच काही वादग्रस्त विधाने करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पडलेल्या फुटीचा निश्चित अर्थ काय, हे ठरवण्याचे काम सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग नजिकच्या कालावधीमध्ये करेलच तोपर्यंत विनाकारण एकमेकांवर चिखलफेक करून राज्यातील वातावरण अधिक दूषित करण्यात काहीच अर्थ नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही कटुता कमी करायची असेल आणि एका विशिष्ट काळानंतर ती संपवायची असेल तर सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी याबाबत गांभीर्याने विचार करून वक्त्यांसाठी आणि इतर नेत्यांसाठीही आचारसंहिता, विचारसंहिता आणि उच्चारसंहिताही निर्माण करण्याची गरज आहे.