इस्लामाबाद – “तेहरिक ए तालिबान पाकिस्तान’ या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्याच्या धोक्यामुळे पाकिस्तानात देशव्यापी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. “टीटीपी’बरोबरची शांतता चर्चा यशस्वी न झाल्यामुळे हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे पाकिस्तानातील प्रसार माध्यामांनी म्हटले आहे.
पाकिस्तान सरकारबरोबर सुरू असलेल्या शांतता चर्चेतून काहीही निष्पन्न होत नसल्याच्या पार्श्वभुमीवर “टीटीपी’ च्या वरिष्ठ नेत्यांनी अफगाणिस्तानातील पख्तिया येथे एकत्र जमून पुढील रणनितीबाबत चर्चा केल्याचे वृत्त आहे. प्रामुख्याने “टीटीपी’ चा कमांडर ओमर खलिद खोरसानी आणि आफताब पार्के या दोघांचा खात्मा झाल्याच्या पार्श्वभुमीवर या चर्चेमध्ये निर्माण झालेल्या कोंडीबाबत ही चर्चा झाली होती.
“टीटीपी’कडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाकिस्तानातील चारही प्रांतांच्या प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देम्यात आल्या आहेत, असे पाकिस्तानातील गृह मंत्रालयाने म्हटले आहे. दहशतवादी कृत्यांची माहिती मिळताच धडक कारवाई करण्यात यावी, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
टीटीपी बरोबर पाकिस्तान सरकारची गेल्या वर्षभरापासून शांतता चर्चा सुरू होती. मात्र पूर्वीचा केंद्रशासित प्रदेश असलेल्या आदिवासी बहुल प्रांत खैबर पख्तुन्वा प्रांताला जोडण्याची “टीटीपी’ची प्रमुख मागणी पाक सरकारने पूर्ण न केल्यामुळे “टीटीपी’मध्ये अस्वस्थता होती.