सरकारच्या अंमलबजावणीकडे सर्वसामान्यांचे लक्ष
राहुल गणगे
पुणे – गेल्या काही काळात वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडून निघाले आहे. मात्र सणासुदीत काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यातच दिवाळी तोंडावर शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी एक मोठा निर्णय घेत दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. दरवर्षी सरकार रेशनधारकांसाठी साखर, खाद्यतेल आणि डाळ देण्याचा फतवा काढत असते. परंतु गोरगरीबांना साखर, तेल व डाळ सणासुदीत तरी नियमित मिळणार का? की पुन्हा तेल, रव्याच्या प्रतीक्षेत नेमकी कोणाची डाळ शिजणार? याबाबत सध्या ग्रामीण भागातील जनतेतून चर्चेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे याबाबत सरकारने कोणती कडक धोरणे राबवून अंमलबजावणी करणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
सरकारकडून रेशन कार्ड धारकांना 100 रुपयांत रवा, डाळ, साखर आणि तेल हे साहित्य देणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.दिवाळी तोंडावर आल्याने सरकारच्या या निर्णयामुळे 1 कोटी 70 लाख कुटुंबांना म्हणजेच 7 कोटी लोकांना प्रत्यक्ष लाभ होणार आहे. शिधापत्रिका धारकांना रवा, चणाडाळ, साखर व खाद्यतेल (प्रत्येकी एक किलो पॅकेज) केवळ शंभर रुपयांत दिले जाणार आहे.करोना काळातही सरकारने शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य दिले. परंतु त्यातही पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानदारांनी त्यातही हात मारल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच अनेक स्वस्त धान्य दुकानदार ई – पॉस मशिनद्वारे नोंदणी न करता अन्नधान्य वाटप करतात. त्यानंतर फावल्या वेळेत अन्नधान्य वाटप केल्याच्या पावत्या काढल्या जातात. त्यामुळे लाभार्थ्यांना नेमके कोणते अन्नधान्य किती प्रमाणात दिले जाते. याबाबत गोलमाल केला जात आहे.
त्यामुळे ऐन दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात तरी तालुकास्तरीय पथकाने ग्रामीण भागातील रेशन दुकानांमध्ये छापे मारण्याची गरज आहे. राज्य, केंद्र सरकार अन्नधान्य मोफत तसेच कमी दरात देण्याच्या घोषणा करते परंतु लाभार्थ्यांना प्रामाणिकपणे लाभ मिळतो की नाही यासाठी तालुकास्तरीय समिती कार्यान्वित करणार का? असा सवालही ग्रामीण भागातून उपस्थित होऊ लागला आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 500 कोटींचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. शिधावस्तूंचा संच दिवाळीपूर्वी वाटप व्हावा, त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. परंतु गोरगरीबांना स्वस्त दरात गोड घास मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
असे मिळणार 100 रुपयांचे पॅकेज
दिवाळी निमित्त शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचं दिवाळी पॅकेज फक्त 100 रूपयांमध्ये देण्याचा निर्णय आहे. या संचात प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना 1 किलो रवा, चणाडाळ, साखर आणि 1 लिटर खाद्यतेल यांचा समावेश आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीसाठी देण्यात येऊन त्याचे वितरण इ-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.