नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेटसाठी झुलन गोस्वामीने मागील दोन दशकापासून मोठे योगदान दिले आहे. झुलनने आपल्या कारकीर्दीतील शेवटचा सामना काल इंग्लंडविरुध्द खेळला. त्याचबरोबर भारतीय महिला संघाने ही 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 असा क्लीन स्वीप देत आपल्या नावावर केली. कालच्या सामन्यावेळी सर्वच भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात भावनिक वातावरण तयार झाले होते. कारण भारतीय महिला क्रिकेटला ओळख मिळवून देणारी झुलन चाहत्यांना पुन्हा कधीही मैदानात खेळताना पाहायला मिळणार नव्हती. झुलनने वयाच्या 39 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तीच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयने प्रतिक्रिया दिली आहे.
झुलनने 2002 साली भारतासाठी पदार्पण केले होते. तीने आपल्या कारकिर्दीत 12 कसोटी, 204 एकदिवसीय आणि 68 टी-20 सामने खेळले आहेत. क्रिकेटच्या सर्व प्रकारात मिळून तीने तब्बल 355 बळी मिळवले आहेत.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी झुलनच्या निवृत्तीबाबत बोलताना म्हटले की, ‘झुलनच्या निवृत्तीच्या घोषणेसोबतच एक युग संपले आहे. झुलनने मोठ्या गर्वाने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचबरोबर तीने नेहमी आपल्या खेळातून भारतासाठी पुरेपूर योगदान दिले आहे. झुलनची कमतरता भारतीय संघाला नेहमीच जाणवेल. तसेच अनेक भावी खेळाडूंना यातून प्रेरणा मिळणार आहे.’
बीसीसीआय सचिव जय शहा यांनी म्हटले की, ‘झुलन महिला क्रिकेटमधील सर्वात महान खेळाडूपैकी एक आहे. तीने मागील बऱ्याच काळापासून भारतीय वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळली आहे. झुलनने मिळवलेली उपलब्धी येणाऱ्या काळातील नवख्या खेळांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे. मी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.’
झुलनने तिच्या कारकिर्दीत पाच एकदिवसीय विश्वचषक खेळले आहेत. यामध्ये 2005, 2009, 2013, 2017, आणि 2022 या विश्वचषकांचा समावेश आहे. झुलन महिला विश्वचषकात सर्वाधिक बळी मिळवणारी गोलंदाज आहे. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 250 पेक्षा जास्त बळी मिळवणारी ती एकमेव गोलंदाज आहे.