शिक्षण क्षेत्राबाबत आपण कधी खोलवर विचार केला का? आपल्या शैक्षणिक संस्था या चौथ्या क्रांतीबद्दल जागरूक आहेत का? आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, 2030 पर्यंत सध्याच्या बहुतांश नोकऱ्या नष्ट होतील आणि नव्याने उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांसाठी आवश्यक अभ्यासक्रम तयार होण्यासाठी शिक्षक, शिकवण्याच्या पद्धती आणि उपकरणे आपल्याकडे अद्याप उपलब्ध नाहीत.
अनेक वर्षांनंतरही आपण शिक्षकांना आणि त्यांच्या पेशाला योग्य तो सन्मान देऊ शकलो आहोत का? चौथी औद्योगिक क्रांती आपला दरवाजा ठोठावत आहे. परंतु आपली सध्याची शिक्षण व्यवस्था अठराव्या शतकातील पहिल्या औद्योगिक क्रांतीने निर्माण केलेल्या रोजगार रचनेनुसार कार्यरत आहे. आपल्या शैक्षणिक संस्था या चौथ्या क्रांतीबद्दल जागरूक असल्याचे दिसत नाही. आमचे धोरणकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, 2030 पर्यंत सध्याच्या बहुतांश नोकऱ्या नष्ट होतील आणि नव्याने उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांसाठी आवश्यक अभ्यासक्रम तयार होण्यासाठी शिक्षक, शिकवण्याच्या पद्धती आणि उपकरणे आपल्याकडे कधी उपलब्ध होतील याविषयी आताच तर्क लावणे अवघड आहे.
वास्तविक, आज जागतिक स्तरावर चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या अनुषंगाने शिक्षण-4.0 बद्दल बरीच चर्चा होत आहे. याला चौथी शैक्षणिक क्रांती असे ढोबळपणे नाव देता येईल. 2030 पर्यंत जगातून शिक्षकांचा पेशा संपणार नसला तरी त्यांचे महत्त्व आणि भूमिकेत नक्कीच मोठा बदल होईल. सर्वांत मोठा बदल असा होऊ शकतो की, शिक्षणाचे कार्य केवळ व्याख्याने देऊन ज्ञानाची देवाणघेवाण करणे नव्हे तर तरुण पिढीला प्रशिक्षक, मार्गदर्शक किंवा मित्र म्हणून भविष्याचा मार्ग दाखविणे हे असेल. म्हणूनच आपण मनात विचार करायला हवा की, शिक्षक होण्याचा अर्थ नेमका काय?
गेल्या 75 वर्षांत शिक्षकांबद्दलची सामाजिक धारणा कशी बदलली आहे, हे आपल्या साहित्य आणि चित्रपटांमधील शिक्षक पात्रांच्या व्यक्तिरेखेतून दिसून येते. प्रेमचंद, बंकिमचंद्र, रवींद्रनाथ टागोर आदी विसाव्या शतकातील लेखकांनी त्यांच्या लेखनात शिक्षकांचे चित्रण अतिशय सकारात्मक पद्धतीने केले आहे. भारतीय चित्रपटांनीही सुरुवातीला शिक्षकांना आदर्श म्हणूनच चित्रित केले. परंतु गेल्या काही दशकांत चित्रपटांमध्ये शिक्षकांना कमी-अधिक प्रमाणात हास्यास्पद पात्रे म्हणून दाखविण्यात आले आहे. भारतीय समाज ज्ञान-विज्ञान, चारित्र्यनिर्मिती, सामाजिक समरसता आणि सामाजिक चिंता यांसारख्या मूल्यांवरील निष्ठा गमावत आहे. त्यामुळे भ्रष्टाचार, सावकारी आणि संधिसाधूपणा यांसारखी नकारात्मक मूल्ये वाढत आहेत. या कालावधीत शिक्षकांच्या व्यावसायिक बांधिलकीमध्ये सतत घट दिसून येते.
परिस्थिती अशी आहे की, देशातील अनेक राज्यांमध्ये अनेक महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये 100 दिवसही अभ्यास होत नाही. आज उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 3.80 कोटी असल्याचे सांगितले जाते. परंतु या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आवश्यक साधनसामग्रीचाही अभाव आहे. कल्पना करा, 2030 पर्यंत उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची संख्या 80 दशलक्षांपर्यंत पोहोचेल तेव्हा परिस्थिती काय असेल? मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या 2018 च्या अहवालानुसार, सध्या देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांत सुमारे 15 लाख शिक्षक कार्यरत आहेत. एका सर्वेक्षणानुसार राज्यांच्या विद्यापीठांमध्ये 40 टक्के आणि केंद्रीय विद्यापीठांमध्ये शिक्षकांची 35 टक्के पदे रिक्त आहेत.
भारतीय समाज आणि सरकारला शिक्षकांच्या भूमिकेचे पुनर्मूल्यांकन करावे लागेल, हे आता उघडच आहे. शिक्षकांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात असे म्हटले आहे की, शिक्षक हे आपले राष्ट्रनिर्माते आहेत. शिक्षकांना पुन्हा उच्च दर्जाचा आदर आणि जीवनमान मिळायला हवे, जेणेकरून उत्तम तरुण प्रतिभावंतांना शिक्षक बनण्याची प्रेरणा मिळेल. आपण त्यांना भारतीय समाजात सन्मानाचे स्थान देण्याच्या स्थितीत आहोत का? आणि एकविसाव्या शतकातील ज्ञानाभिमुख समाजासाठी त्यांना नव्याने प्रशिक्षण आणि प्रेरणा देणार आहोत का? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधावीच लागतील.
हरिवंश चतुर्वेदी