नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना गुलाम नबी आझाद यांनी केलेले वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. आझाद म्हणाले की, आर्टिकल ३७० ना मी मिळवून देऊ शकतो ना काँग्रेस,ना शरद पवार नाही ममता बॅनर्जी. येत्या 10 दिवसांत नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचे देखील आझाद यांनी याच सभेत सांगितले.
आझाद यांचा रिमोट कन्ट्रोल पंतप्रधान मोदींकडे आहे या काँग्रेसच्या आरोपाचा आझाद यांनी समाचार घेतला. काँग्रेस नेत्यांचा रिमोट कंट्रोल सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या हातात असल्याचा इशारा देत आझाद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे सांगितले. ते म्हणाले , ‘मी अशा व्यक्तीसारखा नाही ज्याचा रिमोट कंट्रोल दुसरीकडे आहे. माझ्याकडे माझा रिमोट कंट्रोल आहे. मी आझाद आहे ते गुलाम आहेत. मी नबी (पैगंबर) यांचा गुलाम आहे. ते दुसऱ्याचे गुलाम आहेत. काँग्रेस किंवा इतर पक्षांचे नेते कोणाच्या नियंत्रणाखाली आहेत हे मला उघड करायचे नाही असं स्पष्ट मत आझाद यांनी यावेळी व्यक्त केलं.
सोनिया गांधींना उद्देशून आपल्या पाच पानी राजीनामा पत्रात आझाद यांनी काँग्रेसच्या विनाशासाठी राहुल गांधींना जबाबदार धरले होते. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आझाद यांनी काँग्रेसवर टीका करायला सुरुवात केली होती. त्यानंतर काँग्रेसकडूनही आरोप प्रत्यारोपला सुरुवात झाल्याचे दिसून आले होते. आता आझाद यांची पुढील रणनीती नेमकी काय असेल याकडे देशाचे लक्ष लागून आहे.