नवी दिल्ली – अमेरिकेसह विकसित देशात मंदीची शक्यता निर्माण झाल्यामुळे कच्च्या तेलाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर सध्या सहा महिन्याच्या निचांकी पातळीवर आले आहेत. रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतर भारतासह इतर देशासमोर महाग कच्च्या तेलाचा प्रश्न निर्माण झाला होता.
आता कच्च्या तेलाचे दर 91 डॉलर प्रति पिंप या पातळीवर आहेत. भारतामध्ये महागाईची आकडेवारी वाढल्यानंतर महागाई कमी व्हावी याकरिता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन या कंपन्यांनी गेल्या साडेचार महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली नव्हती. त्यामुळे एकेकाळी प्रत्येक लिटर डिझेलमागे या कंपन्यांना 25 रुपये तर प्रति लिटर पेट्रोल मागे 18 रुपयाचा तोटा होत होता.
मात्र आता पेट्रोल विक्रीमागे कंपन्यांना तोटयाऐवजी थोडाफार नफा होऊ लागला आहे. डिझेलमध्ये मात्र अजूनही प्रति लिटर मागे पाच रुपयाचा तोटा होत आहे. आगामी काळातही जर कच्च्या तेलाचे दर कमी झाले तरीही कंपन्या दरात कपात करण्याची शक्यता कमी आहे. कारण त्यांना अगोदरच बराच तोटा झालेला आहे.
हा तोटा भरून निघाल्यानंतरच या कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अगोदर पेट्रोल आणि डिझेल कंपन्यांनी 22 मार्च रोजी या दोन्ही इंधनाच्या दरात काही प्रमाणात वाढ केली होती. मात्र नंतर महागाई कमी करण्यासाठी कंपन्यांनी या दोन इंधनाच्या दरात वाढ टाळली आहे. त्यामुळे आतापर्यंत या कंपन्यांना 18,480 कोटी रुपयांचा तोटा झाला. हा तोटा भरून निघेपर्यंत या कंपन्या इंधनाच्या दरात कपात करण्याची शक्यता नाही.
मात्र दरम्यानच्या काळामध्ये महागाईची आकडेवारी कमी झाली आहे. रिझर्व्ह बॅंकेने महागाई कमी करण्यासाठी व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे त्याचा एकत्रित परिणाम महागाईवर होत आहे. जर पुढील महिन्यात महागाई आणखी कमी झाली तर रिझर्व्ह बॅंक व्याज दरवाढ कमी करेल. त्याचबरोबर इंधन कंपन्या इंधनाच्या दरात कपात करण्याच्या शक्यतेवर विचार करू शकतील.