डॉ. मेघश्री दळवी
हवामान बदलाचे परिणाम आपल्या आयुष्यावर होत असल्याचा अनुभव आपण आज घेतोच आहोत. पण हे परिणाम किती वेगवेगळ्या पातळीवर होणार आहेत, आणि त्याने एकूणच आपल्या जीवनशैलीत किती प्रमाणात फरक पडणार आहे, यावरचे निष्कर्ष आता येऊ लागलेले आहेत.
झुरिक विद्यापीठातल्या एका संशोधक गटाने अरेबिका प्रकारच्या कॉफी उत्पादनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. या कॉफीला विशिष्ट हवामान लागतं. सध्या मध्य आणि दक्षिण अमेरिकेत या कॉफीचं उत्पादन होतं. ब्राझील हा देश त्यात आघाडीवर आहे. तर मध्य आणि पश्चिम आफ्रिका आणि आशियाच्या दक्षिण भागात देखील या कॉफीला पूरक हवामान आहे.
मात्र, या संशोधनानुसार, येत्या अठ्ठावीस वर्षांमध्ये, म्हणजे 2050 पर्यंत अरेबिका कॉफी उत्पादनातल्या अग्रेसर देशांना हवामान बदलाचा प्रचंड फटका बसणार आहे. ब्राझीलच्या जोडीने कोलंबिया, व्हिएतनाम, आणि इंडोनेशिया या देशांमध्ये हवामान बदलाचे घातक परिणाम दिसायला लागले आहेत. वाढत्या तापमानामुळे कॉफीचा दर्जा घसरायला लागला आहे आणि एकरी उत्पादन घटायला लागलं आहे. अनपेक्षितपणे तापमानात होणारे चढउतार, पावसाचा अभाव, अचानक कडक थंडी याला तोंड देताना मागच्या वर्षी ब्राझीलचं कॉफी उत्पादन साडेसात टक्क्यांनी कमी झालं.
आज या व्यवसायात जागतिक पातळीवर शंभर अब्ज डॉलर्सहून अधिक उलाढाल होते. त्यात अरेबिकाचा वाटा सर्वाधिक आहे. कॉफीचा खप युरोप आणि उत्तर अमेरिका खंडात जास्त आहे, तर उत्पादन आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत होत असल्याने आयात-निर्यात व्यवसायात कॉफीचं स्थान मोठं आहे. वाढत्या तापमानामुळे एकट्या ब्राझीलची निर्यात 2050 पर्यंत वीस टक्क्यांनी कमी होईल असा अंदाज आहे. हवामान बदलाचे परिणाम भौमितिक श्रेणीने वाढत जाणार असं दिसत असल्याने आणखी पन्नास वर्षांमध्ये ही निर्यात ऐंशी टक्क्यांपर्यंत घसरू शकते. एखाद्या देशाचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं अशी ही आकडेवारी आहे, तीही केवळ एका पिकामुळे.
अरेबिका कॉफीचं उत्पादन घटत गेलं आणि तिची किंमत वाढत गेली, तर कॉफी पिणारे कदाचित कमी दर्जाच्या कॉफीकडे वळतील. कॉफी पिणं कमी करतील किंवा एखाद्या स्थानिक प्रकाराचा वापर करायला लागतील. सध्या उत्पादन होतं त्या पट्ट्याच्या किंचित उत्तरेला आणि दक्षिणेला असलेल्या देशांमध्ये कदाचित अरेबिका लावायला सुरुवात होईल. त्यामुळे या व्यवसायाचा भौगोलिक नकाशा बदलेल आणि त्याला राजकीय रंग असतील ते वेगळंच.
कॉफीच्या संशोधनावरून इतर धान्य किंवा आजच्या आपल्या आहारातल्या भाज्या, फळं यांच्यावर होणाऱ्या परिणामांचा अंदाज येऊ शकतो. आपल्याकडे द्राक्षासारख्या पिकांची अशी स्थिती होताना दिसते आहे. उलट दुसरी काही पिकं आपल्याकडे जोमाने वाढायला लागतील. हा बदल जितक्या वेगाने होईल, तितक्या वेगाने आपण त्याच्याशी जुळवून घेऊ शकू का, हा मात्र प्रश्न आहे.