नवी दिल्ली – देशामध्ये गव्हाच्या टंचाईचा कसलाही प्रश्न नाही. केंद्र सरकारने गहू निर्यातीवर घातलेल्या बंदीमुळे देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर कसलाही परिणाम झालेला नाही असे स्पष्टीकरण केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले आहे.
संसदेमध्ये या विषयावर बोलताना तोमर म्हणाले की, देशातील सर्व भागांमध्ये गव्हाच्या किमती आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर कसलाही परिणाम झालेला नाही किंवा आगामी काळात होण्याची शक्यता नाही.
कृषी विभागाने केलेल्या मूल्यांकनानुसार यावर्षी देशांमध्ये गव्हाचे पीक 106 दशलक्ष टन इतके होईल. साधारणपणे भारतामध्ये वर्षाला 103 दशलक्ष टन गहू निर्माण होतो. त्यापेक्षा यावर्षी तयार होणारा गहू जास्त असेल असे यावरून दिसून येते. गेल्या वर्षी देशांमध्ये गव्हाचे 109 दशलक्ष टन एवढे उत्पादन झाले होते. भारत आपल्या गरजेपेक्षा जास्त गहू निर्माण करतो. त्यामुळे भारतात कुठल्याही भागांमध्ये गव्हाची टंचाई नाही.
मात्र भविष्यामध्ये अशी टंचाई निर्माण होऊ नये आणि शेजारी व गरजवंत देशाना गव्हाचा साठा उपलब्ध व्हावा याकरिता 13 मे रोजी केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर अंशतः बंदी घातली आहे. मात्र ज्या देशांना खरेच गव्हाची गरज आहे अशा देशांना काही प्रमाणात गहू उपलब्ध केला जाणार आहे. गेल्या वर्षी भारताने सात दशलक्ष टन गव्हाची निर्यात केली होती.