न्यू यॉर्क – भारताने गव्हाची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या भावात अचानक दरवाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत आपल्या या निर्णयाचा फेरविचार करेल अशी अपेक्षा अमेरिकेने व्यक्त केली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात आधीच गव्हाची टंचाई निर्माण झाली असताना भारताने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किंमती सुमारे 40 टक्क्यांनी वाढल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भारताच्या या निर्णयावर जगातील अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर संयुक्तराष्ट्रांतील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांनी म्हटले आहे की, अशा स्वरूपाच्या कोणत्याही निर्णयामुळे अन्न टंचाई वाढेल त्यामुळे कोणत्याही देशाने अशा स्वरूपाचे निर्णय घेऊ नये अशीच आमची भूमिका असते. भारताच्या या निर्णयाविषयी अन्य देशांनीही चिंता व्यक्त केली आहे त्यामुळे भारत आपल्या भूमिकेचा पुर्नरविचार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
युक्रेन मधून मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात होत होती. विकसनशील जगासाठी युक्रेन हा ब्रेडबास्केट म्हणून गणला जात होता. पण रशियाच्या हल्ल्यामुळे अफ्रिका आणि मध्यपुर्वेतील देशांत होणारी त्यांची धान्य निर्यात थांबल्याने तेथे उपासमारीचीही समस्या उद्भवण्याचा धोका आहे. त्यामुळे भारताच्या या निर्णयावर जी 7 ही संघटना तसेच जगातील अन्य देशांनीही चिंता व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.
लिंडा ग्रीन फिल्ड या अमेरिकेच्या संयुक्तराष्ट्रांतील राजदूत आहेत आणि महत्वाचे म्हणजे अमेरिका मे महिन्यासाठी संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहे. त्या जबाबदारीत त्यांनी जागतिक अन्न सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे. की, अन्नाची टंचाई हे संपूर्ण जगासाठी एक संकट आहे आणि म्हणूनच ते संयुक्त राष्ट्रांचेही संकट आहे असे आम्ही मानतो. जेवणाच्या चिंतेत असलेल्या लाखो लोकांसाठी काम करणे ही आमची जबाबदारी आहे असे त्यांनी म्हटले आहे.