पुणे – प्रसिद्ध साहित्यिक अनंत यशवंत ऊर्फ नंदा खरे यांचे शुक्रवारी पुण्यात निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी विद्यागौरी, मुलगा अमिताभ आणि मुलगी नर्मदा असा परिवार आहे. खरे यांचा जन्म 2 ऑक्टोबर, 1946 रोजी झाला.
खरे यांच्या “अंताजीची बखर’, बखर अंतकाळाची’ आणि “उद्या’ या कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. या शिवाय “दगडावर दगड’, “विटेवर वीट’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. “उद्या’ ह्या कादंबरीला सन 2015 साली “लोकमंगल साहित्य पुरस्कार’ मिळाला. 2017 साली त्यांनी यापुढे कोणताही पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे 2020 साली “उद्या’ या कादंबरीला जाहीर झालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांनी नाकारला. मात्र नकारामागे कोणतेही राजकीय कारण नसल्याने त्यावेळी त्यांनी स्पष्ट केले होते.
खरे यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नागपुरात झाले. सन 1962-67 या काळात त्यांनी मुंबईतील “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेत सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. सन 2001 सालापर्यंत एका खाजगी कंपनीत ते कार्यरत होते. उजनी धरणाच्या बांधकामात त्यांचा मोठा वाटा आहे.
सन 1993 ते 2017 या काळात खरे यांनी “आजचा सुधारक’ या मासिकाच्या विश्वस्त मंडळावर काम केले. यापैकी सन 2000 ते 2011 या काळात ते कार्यकारी संपादक होते. त्याचप्रमाणे सन 1984 ते 1991 ह्या कालखंडात ते मराठी विज्ञान परिषदेशी संलग्न होते. विवेकवादी विज्ञानाचा प्रसार व्हावा या हेतूने माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ते शैक्षणिक कार्यक्रम घेत असत.
मिळालेले पुरस्कार
-“ज्ञाताच्या कुंपणावरून’ या हस्तलिखितास 1985 साली “ग्रंथाली’चा द्वितीय पुरस्कार
-“वीसशे पन्नास’ या कादंबरीस 1995 साली विदर्भ साहित्य संघाचा गो. रा. दोडके स्मृती वाङ्मय पुरस्कार
-“कहाणी मानवप्राण्याची’ या ग्रंथाला 2010 साली महाराष्ट्र शासनाचा भाई माधवराव बागल पुरस्कार आणि प्रियदर्शन ऍकॅडमीचा वार्षिक साहित्य पुरस्कार
-एकूण कादंबरीलेखनासाठी 2014 साली “शब्द : द बुक गॅलरी’ या संस्थेचा भाऊ पाध्ये पुरस्कार