एखादी व्यक्ती ही संत असली काय किंवा संसारी असली काय दोन्हीकडे माणूसच आहे. असं असताना संत आणि संसारी माणसात नेमका फरक काय? या अवघड प्रश्नाचं एक साधं आणि सोपं असं एक उत्तर नुकतंच एका पुस्तकात वाचायला मिळालं, ते असं की, “जो घर सांभाळतो तो संसारी आणि जो मन सांभाळतो तो संत.’ त्या विचारवंतांने केलेली ही व्याख्या वाचली आणि त्यावेळी थोडा बारकाईने विचार केला तेव्हा असं लक्षात आलं की, आपले काही संत संसारीही होते. मग नेमका जो फरक आहे तो कशात आहे?
या गोष्टीचा बारकाईने विचार केला तेव्हा लक्षात आले की, दोन्हीकडे माणूस हा जरी एकच सामायिक घटक असला, तरी त्या माणसा-माणसात आणि त्याच्या वैचारिक मानसिकतेत फार मोठा फरक आहे. कारण, संसारी माणूस हा फक्त तो, त्याचे घर, त्याची चार माणसं यांच्याच सुखाचा, भल्याचा आणि कल्याणाचा विचार करत असतो. त्यांचीच त्याला चिंता असते, काळजी असते.
इथे घर हा शब्द दोन अर्थांनी लक्षात घ्यावा लागतो. एक म्हणजे त्याचे दगडविटांचे, मातीचे घर आणि दुसरे म्हणजे त्याचे देहरूपी घर. या दोन्हीची तो काळज़ी घेतो. संसारी माणूस हा आपलं घर आणि देह हा स्वच्छ, नीटनेटका ठेवण्याची खबरदारी घेतो. तो माती अन् माणसं सांभाळतो. त्यांचं हवं नको पाहण्यातच आपला उभा जन्म घालवतो.
पण संतांचं तसं नाही. ते त्यांचं घरदार याबाबत अत्यंत अनासक्त असतात, उदासीन असतात. ते वरवरच्या देहाच्या नाही तर मनाच्या स्वच्छतेचा, त्याला मलिन होण्यापासून रोखण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतात. संत हे आपल्या आचार, विचार, कृतीतून इतरांची मने दुखावली जाणार नाहीत याची जास्त काळजी घेत असतात. ते मनापासून सर्वांवर प्रेम करतात.
त्यांच्याकडे आपपरभाव नसतो. ते सर्व प्राणिमात्राच्या कल्याणाचा, भल्याचा, उन्नतीचा, उद्धाराचा विचार करत असतात. त्यांची दृष्टी ही संकुचित नाही तर व्यापक असते. त्यांचं मन हे आभाळासारखं इतरांना त्यात सामावून घेण्याइतकं विशाल असतं आणि म्हणूनच संत हे संसारी माणसांच्या मनावरही राज्य करतात. त्यास वंदनीय आणि पूजनीय होतात.