राजगुरूनगर (रामचंद्र सोनवणे) : डेहणे -नायफड रस्त्यावर असलेल्या काळूबाई खिंडीत सलग दोन दिवस दरडी कोसळल्या आहे. सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही मात्र रस्त्यात दगड, माती, मुरूम आल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली आहे.
खेडच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत आहे.यामुळे रस्त्यावर डोंगरावर दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे गेली. चार दिवसांपासून जोराचा पाऊस पडत असल्याने दरडी कोसळण्याच्या वाढ झाली आहे. स्थनिक नागरिक अलर्ट आहेत मात्र शासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग बेफीकिरआहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे हवे तसे लक्ष देत नाहीत. उन्हाळयात सर्वेक्षण होत नसल्याने रस्त्यावर दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे.
डेहणे – नायफड येथे नवीन रस्ता केला जात आहे. या रस्त्यासाठी कोरडेवाडी नजीक असलेली खिंडीत मोठे खोदकाम केले आहे खिंडीतील चढ कमी करण्यासाठी डोंगर पोखरला आहे. मात्र तो पोखरताना भविष्यात दोन्ही बाजूकडून दरड कोसळेल याचे भान ठेकेदाराने ठेवले नाही. सलग चार ते पाच दिवस या परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने नायफड रस्त्याच्या खिंडीत मधोमध काल (दि.१२) सकाळी दरड कोसळली होती.
दरड कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मधुकर भिंगारदिवे यांनी ठेकेदारासह भेट देऊन पाहणी केली होती. स्थानिकांच्या माध्यमातून जेसीबीच्या साहाय्याने रस्ता खुला करण्यात आला होता. मात्र आज (दि.१३) दुपारी बाराच्या सुमारास पुन्हा त्याच ठिकाणी दरड कोसळली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूकडून जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली आहे सुदैवाने दरड कोसळली त्यावेळी रस्त्याने कोणी जात नव्हते असे ग्रासमथानी संगितले तथापि त्यांच्याकडून भीतीही व्यक्त केली जात आहे.दरड कोसळण्याला संबंधित ठेकेदार जबाबदार आहे त्यांनी रस्ता करताना याकडे दुर्लक्ष केले आहे.
दरम्यान या रस्त्याचे काम नूतनीकरणाचे काम सुरु आहे मात्र ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेकदा याबाबत ठेकेदाराला सांगूनही त्यात बदल केला जात नाही. या रस्त्यावरील खिंडीतील चढण कमी करण्यासाठी खोदकाम झाले मात्र त्यातून निघालेला मुरूम ठेकेदाराने इतर ठिकाणी दिला आहे. व ज्या ठिकाणी रस्ता भराव करायचा आहे त्या ठिकाणी माती आणून टाकली आहे पहिल्याच पावसात हा रस्ता घसरगुंडीचा झाल्याने अनेक दुचाकीस्वार पडले. भरावाची माती लगतच्या शेतात वाहून गेली आहे. पश्चिम भागात अनेक निधी येतो मात्र कामे ठेकेदार पुढाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे कामे हलक्या दर्जाची करीत आहेत. त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रूपांचा निधी वाया जात आहे.
दरम्यान नायफड रस्त्यावर असलेल्या काळूबाई खिंडीतील दरड कोसळल्याने दोन्ही बाजूकडून वाहने जात नसल्याने गरसोय झाली आहे. स्थानिक नागरिकांकडून जेसीबी मागवण्यात आला असून अद्याप पर्यंत दरड जैसे थे आहे. रस्त्यात मोठे मोठे दगड आल्याने पायी जाणाऱ्यांना अडचणीचे होत आहे.
याबाबत खेड तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष शरद जठार यांनी सांगितले की, खेडच्या पश्चिम भागात अनेक ठिकाणी रस्त्यावर दरडी कोसळण्याची भीती आहे. शासकीय यंत्रणेचे या भागात सपशेल दुर्लक्ष आहे. प्रशासन घटनेनंतर जागे होत आहे. स्थानिकांमध्ये भीती आहे. प्रशासनाने वेळीच दखल घेत दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी उपायोजना करावी. सर्वेक्षण करून आवश्यक ती साधन सामुग्री उपलब्ध करावी जेणॆदारून नागरिकांची गैरसोय होणार नाही. या भागात डेहणे भोरगिरी येथे पर्जन्यमापन यंत्र बसवावे.