पुणे : रेल्वे प्रवासादरम्यान जेवण आणण्यासाठी संपुर्ण बोगीतील प्रवाशांचे पैसे घेऊन आयआरसीटीसीचं ओळखपत्र घातलेला तोतया कर्मचारी फरार झाला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांची फसवणुकीची घटना शनिवारी उघड झाली असली तरी प्रवाशांवर संपूर्ण प्रवासात उपाशी राहण्याची वेळ आली.
पुण्यावरून नांदेडला जाण्यासाठी पनवेल नांदेड एक्सप्रेसमध्ये 07:45 मिनीटांनी शनिवारी प्रवासी पुणे स्टेशनवरू बसले. काही अंतर गेल्यानंतर ट्रेनमध्ये आयआरसीटीसीचं बनावट ओळखपत्र घातलेला आणि युनिफॉर्म वाटावा, असे कपडे घातलेला तोतया कर्मचारी आला आणि त्याने जेवणाची ऑर्डर घेण्यास सुरवात केली. बऱ्याच प्रवाशांनी त्याला जेवणाची ऑर्डर दिली. त्या कर्मचाऱ्याने प्रवाशांकडून दौंड स्थानक येण्यापूर्वी जेवणाची ऑर्डर करा, दौंड स्थानकानंतर पुढे ट्रेन थांबणार नाही, असे सांगून बोगातील जवळपास सर्व प्रवाशांकडून ऑर्डर घेतल्या. तसेच “दौंड स्टेशन आनेपर खाना मिलेगा’, असे सांगितले. विक्रेता 15 मिनिटांनी परत आला आणि त्यांनी जेवणाचे पैसे मागितले. प्रवाशांकडून ऑनलाइन पैसे घेण्यास नकार दिला आणि केवळ रोख पैसे देण्याचा आग्रह धरला. प्रवाशांनी रोख रक्कम दिली. पण, दौंड स्टेशन जाऊन तासभर गेला, पुढे कुर्डुवाडी आले. पण, तो कर्मचारीही आला नाही आणि कोणी जेवण घेऊनही आले नाही. अधिक चौकशी केली असता रेल्वेचा असा कोणी कर्मचारी जेवणाची ऑर्डर घेत नाही, अशी बाब समोर आली.
रेल्वे स्थानकावर बरेच विनापरवाना विक्रेते आहेत, रेल्वे प्रशासनाने त्या विक्रेत्यावर बंदी आणली पाहिजे. सुरक्षितेच्या दृष्टीने विनापरवाना विक्रेते धोकादायक आहे. रेल्वे प्रशासनाने यांच्यावर कारवाई केली पाहिजे. नागरिंकानी देखील विनापरवाना विक्रेत्याकडून कोणतीही वस्तू खरेदी करू नये.
– विकास देशपांडे, विभागीय सल्लागार समिती, सोलापूर विभाग
पुणे रेल्वे स्थानकावर अनेक विनापरवाना विक्रेते आहेत. विषेश म्हणजे या कर्मचाऱ्यांच्या अगांवर आयआरसीटीच्या कर्मचाऱ्यांसारखे कपडे असतात. पण, रेल्वे प्रशासन यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. विक्रेत्यांना रेल्वेमध्ये जाऊन खाण्याचे पदार्थ विकण्याची परवानगी नसताना देखील ते विक्री करीत आहे. प्रशासनाने यावर कारवाई करावी.
– हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुपविभाग
प्रवाशांनी अधिकृत विक्रेत्यांकडून जेवण घ्यावे, जेवणाची ऑर्डर आणून दिल्यानंतरच पैसे दिले पाहिजेत आणि त्याचे बिल घेतले पाहिजे. जर कोणाबरोबर असा प्रकार घडला असेल तर त्यांनी 139 नंबरवर तक्रार करावी किंवा टिसीकडे तक्रार करावी.
– मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी
मी प्रवासादरम्यान आयआरसीटीसी ओळखपत्र असलेल्या कर्मचाऱ्यांकडे जेवणाची थाळी ऑर्डर केली. त्याने दौंड स्थानक आल्यावर जेवण आणून देतो, असे सांगितले. पण, कुर्डुवाडी स्थानक आले तरी जेवण काही आणून दिले नाही. मी रितसर टीसी आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे.
– एक प्रवासी, पुणे