लखनौ – आज लागोपाठ तिसऱ्या दिवशीही उत्तरप्रदेशातील युवक रस्त्यावर उतरले. त्यांनी रेल्वेच्या डब्यांनी आगी लावल्या, अनेक ठिकाणी रेल्वे रोखून धरल्या त्यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून अनेक रेल्वे गाड्या आज रद्द कराव्या लागल्या. आग्रा-लखनौ मार्गावर वाहनांवर दगडफेक करण्यात आली.
यमुना एक्स्प्रेस व वरील वाहतुकही आंदोलनामुळे काही काळ खंडित झाली होती. वाराणसी, फिरोजाबाद, आणि अमेठी येथेही योजनेच्या विरोधात हिंसक निदर्शने झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी निदर्शकांना पांगवण्यासाठी अनेक ठिकाणी लाठीमारही केला.
बलियात वीर लोरिक स्टेडियमवर युवकांचा एक मोठा जमाव जमला होता. तेथे त्यांनी अग्निपथ योजनेच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर हा जमाव बलिया रेल्वे स्टेशनवर गेला. तेथे त्यांनी बलिया- वाराणसी मेमु गाडीची मोडतोड केली. बलिया-शहागंज गाडीचेही निदर्शकांनी मोठे नुकसान केले. रेल्वे गोदामाच्या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केली.
त्यात खासगी वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर संतप्त जमावाने पोलिस ठाण्याच्या दिशेने आपला मोर्चा वळवला व त्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचे वृत्त आहे. आग्रा-लखनौ मार्गावरील दगडफेकीत चार बसेसचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी सांगितले की या साऱ्या घटनांचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले असून यात सहभागी झालेल्यांना ओळखून त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाणार आहे.
वाराणसीत युवकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करीत कॅन्टोन्मेंट रेल्वे स्थानक आणि आसपाच्या भागात दगडफेक केल्याचे वृत्त आहे. अमेठीतील निदर्शकांनी अमेठी दुर्गापुर रस्ता रोखून धरला होता. दरम्यान या आंदोलनामुळे उत्तरपुर्व रेल्वेच्या 11 गाड्या रद्द करण्यात आल्या. पंधरा रेल्वे गाड्या विविध रेल्वे स्थानकावर थांबून ठेवण्यात आल्या आहेत. स्थिती निवळल्यानंतर त्या सोडल्या जाणार आहेत.