मुंबई – आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर बीसीसीआयने शनिवारी रणजी चषक स्पर्धेतील नॉकआऊट सामन्यांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार नॉकआऊटचे सामने दोन दिवस उशिराने म्हणजे 6 जूनपासून सुरू होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर 22 जून रोजी रंगणार आहे.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी रणजी चषकाचे साखळी सामने खेळवले गेले होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर रणजी चषकाचा यंदाचा हंगाम उशिराने सुरू झाला होता. यंदाच्या हंगामात बंगाल, झारखंड, मुंबई, उत्तराखंड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेश या संघांनी नॉकआऊट फेरीत प्रवेश केलेला आहे.
उपांत्यपूर्व फेरीतील सामने 6 जून ते 10 जून दरम्यान खेळले जाणार आहेत. यात पहिला उपांत्यपूर्व सामना बंगाल विरुद्ध झारंखड, दुसरा उपांत्यपूर्व सामना मुंबई विरुद्ध उत्तराखंड, तिसरा उपांत्यपूर्व सामना कर्नाटक विरुद्ध उत्तर प्रदेश आणि चौथा उपांत्यपूर्व सामना पंजाब विरुद्ध मध्य प्रदेश यांच्यात होणार आहे.
उपांत्यपूर्व फेरीतील सामने संपल्यानंतर 14 जून ते 18 जून दरम्यान उपांत्य फेरीचे सामने होणार आहे. यानंतर स्पर्धेतील अंतिम सामना 22 जून ते 26 जून दरम्यान खेळला जाणार आहे.