झारखंडमधील शेतकऱ्यांचे पथदर्शक प्रकल्प
रांची – झारखंड राज्यातील बुढमू तालुक्यातील बेरवारी गावातील 40 वर्षांच्या रामेश्वर महातोचे आयुष्यच गाई आणि दुधाच्या व्यवसायाने बदलून गेले आहे. बांधकामावर मिस्त्री म्हणून काम करणाऱ्या रामेश्वरला काबाडकष्ट करूनही कुटुंबाच्या चरितार्थापुरती कमाई व्हायची ना मिस्त्री म्हणून समाजात प्रतिष्ठा होती.
अजून काही दिवस मिस्त्री म्हणून बांधकामांवर काम करता येईल पण शरीर थकल्यावर काय, असा चिंता त्याला सतावत होती. अशातच तो रामकृष्ण मिशनद्वारे चालवण्यात येणाऱ्या दिव्यायन कृषि विज्ञान केंद्राच्या संपर्कात आला. तेथील कृषीतज्ज्ञांनी त्याला गाई पाळण्याचा सल्ला दिला. मग त्यासाठी त्याने दिव्यायन कृषी विज्ञान केंद्रात गाई पाळण्यासाठीचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. मग बंगळूरू येथील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात जाऊन गाईच्या शेणापासून खत आणि गोमूत्रापासून कीटकनाशक तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले.
2005 मध्ये त्याने कर्ज काढून साहिवाल या देशी जातीची गाय खरेदी केली. रांचीमधील शामाप्रसाद विद्यापीठाजवळील एका व्यक्तीच्या रिकाम्या जागेवर शेड मारून गाई पाळण्यास सुरवात केली. एकपासून दोन, आणि मग गाईंच्या संख्या वाढत गेली. त्याचवेळी घरोघरी जाऊन दुधाचा रतीब घालण्याचे काम त्यांनी सुरू केले होते. रांचीतील शेडमधील जागा कमी पडू लागल्याने रामेश्वर सगळ्या गायी घेऊन गावी गेले. त्याठिकाणी गोपालनाचा व्यवसाय वाढवला.
आज त्यांच्याकडे साहिवाल, गीर, आणि होस्टेन फ्रिसियन जातीच्या मिळून 16 गायी आहेत आणि सहा वासरे आहेत. रोज 150 लिटर दूध उत्पादन होते आणि सुमारे 35 रुपये लिटर भावाने ते स्थानिक मेधा डेअरीला ते दूध घालतात. त्यातून त्यांना सुमारे दीड लाख रूपये महिन्याला मिळतात. जनावरांच्या चाऱ्याचा खर्च, गड्यांची मजुरी त्यातूनच भागवावी लागते. त्याखेरीज गायीच्या शेणापासून ते स्वयंपाकासाठीचा गॅस तयार करतात तसेच गोमूत्रापासून कीटकनाशक तयार करतात. शेणापासून ते उत्तम प्रतीचे खतही तयार करतात. त्यांच्या सांगण्यानुसार आता त्यांची आर्थिक चणचण कमी झालेली असून मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी चार पैसे शिल्लक ठेवता येतात.
रांची जिल्ह्यातील नगडी तालुक्यातील हरही गावाचे विश्वेश्वर शाही देखील गोपालनासोबतच शेणापासून खत उत्पादन आणि गोठा धुतल्यानंतर जे पाणी वाहून जाते ते जमा करून त्याचे वापर शेतामध्ये करतात. त्यांच्याकडे एकूण 30 गाई आहेत. त्यामध्ये साहिवाल या देशी जातीची तसेच होल्स्टन फ्रिसियन जातीच्या जर्सी गाई आहेत. गीर जातीचा बैल आहे.
हळूहळू गीर जातीच्या गाईंची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नात ते आहेत. त्यांच्या गोठ्यातून रोज 200 लिटर दुधाचे उत्पादन होते. त्यांच्या गोठ्यातूनच डेअरचालक जागेवर प्रतिलिटर 35 रुपयांनी दूध घेऊन जातात. 2011 मध्ये गो विकास योजनेतून त्यांनी पाच गाई घेतल्या होत्या. त्या पाच गाईंच्या आता 30 गाई झाल्या आहेत. गोपालनातून त्यांनी केलेली प्रगती पाहून आता गावातील अन्य लोकांनी देखील गोपालन सुरू केले आहे.
विश्वेश्वर केवळ दुधावरच अवलंबून नाहीत. गाईच्या शेणापासून ते स्वयंपाकासाठी गॅस तयार करतात आणि तो 50 कुटुंबांच्या घरी पोचवला आहे. गावच्या सहभागाने उभारण्यात आलेल्या या गॅस प्रकल्पात रोज 50 कुटुंबातील गाईंचे शेण टाकण्यात येते. मागील अनेक वर्षांपासून हा गॅस प्रकल्प सुरू आहे. शेणापासून खतही बनवले जाते. ताजे शेण 50 ते 60 पैसे किलो भावाने विकले जाते. मात्र त्यापासून तयार झालेले खत चार रूपये प्रति किलो भावाने विकले जाते.