मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा देत मशिदींवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली. हा मुद्दा संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला होता. त्यांनी भोंगे सुरू असलेल्या मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण कऱण्याचा आदेशही मनसैनिकांना दिला होता. त्यामुळे राज्यभरात सुरक्षा वाढविण्यात आली होती. आता या संदर्भात राज ठाकरे यांनी मनसैनिकांसाठी एक पत्र पाठवलं आहे.
राज ठाकरे यांनी भोंग्यांचा विषय आपल्याला लावून धरायचा आहे, असं म्हणत मनसैनिकांना पत्रकाद्वारे पुढील कार्यक्रम दिला आहे.
राज ठाकरे पत्रकात म्हणतात की, माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा
महाराष्ट्र सैनिकांसाठी… pic.twitter.com/vCoubS5Aix
— Raj Thackeray (@RajThackeray) June 2, 2022
राज ठाकरे पुढं म्हणाले की, तुम्ही एकच करायचं, माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील घराघरात स्वतः नेऊन द्यायचं आहे. कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही. मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही.