देशात राष्ट्रपती, राज्यसभा तसेच गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी भारतीय जनता पक्ष एकीकडे मैदानात उतरला आहे, तर दुसरीकडे कॉंग्रेसला या निवडणुकांचे भान तरी आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
देशात निवडणुकीचा हंगाम सुरू झाला आहे. जुलैमध्ये भारताच्या 17 व्या राष्ट्रपतीची निवडणूक होणे आहे. राज्यसभेच्या 57 जागांसाठीही निवडणूक होणार आहे. याशिवाय, यंदा वर्षांच्या शेवटी गुजरात आणि हिमाचल प्रदेशात विधानसभेची निवडणूक होणे आहे. यानंतर 2023 च्या सुरुवातीला राजस्थान आणि मध्य प्रदेश विधानसभेसाठी मतदान होईल. थोडक्यात, जिकडे-तिकडे चोहीकडे निवडणुकाच निवडणुका आहेत. भारतीय जनता पक्षासह सर्व राजकीय पक्षांनी राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराचा शोध घेणे सुरू केले आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद 25 जुलै रोजी निवृत्त होतील. तत्पूर्वी, राष्ट्रपतीची निवडणूक संपन्न झाली असेल.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत देशाचे नागरिक जसे निवडणूक करतात तसे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत करीत नाहीत. मात्र, लोकांनी निवडून दिलेले खासदार-आमदार राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करतात. मतदान करताना खासदार आपल्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीनुसार मतदान करतात. भाजपसाठी मतांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या खांद्यावर आहे. मित्र पक्षांच्या नावावर भाजपकडे सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल नावाचा पक्ष आहे. यूपीत अपना दल आणि निषाद पक्ष आहे.
महाराष्ट्रातील शिवसेनेसारख्या पक्षाने तीन वर्षांपूर्वी तीस वर्षांची मैत्री तोडली. आता दोन्ही पक्षात छत्तीसचा आकडा आहे. यामुळे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सेनेची मदत होण्याची शक्यता कमी आहे. सेनेचे खासदार संजय राऊत यांची संपत्ती जप्त केल्यापासून भाजप-सेनेचे शत्रुत्व शिगेला पोहोचले आहे. यात भर पडली आहे ती मुंबई महानगरपालिकेवर पडलेल्या भाजपच्या नजरेची. तरीसुद्धा, सेना अपवादात्मक परिस्थितीमध्ये भाजपला राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मदत करू शकते. भाजपकडून लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. सुमित्राताई राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार असतील तर मराठी माणसाच्या नावावर सेना त्यांना मतदान करू शकते. परंतु, आतापर्यंतच्या इतिहासात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सेनेने नेहमीच भाजपच्या विरोधात भूमिका घेतली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा जुळवाजुळव करण्यात तरबेज आहेत. उभय नेत्यांनी क्षेत्रीय पक्षांना सोबत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. आंध्र प्रदेशातील वायएसआर कॉंग्रेसचे जगनमोहन रेड्डी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बीजू जनता दल भाजपच्या उमेदवाराला मतदान करू शकतात अशी चर्चा आहे.
भाजपप्रणित रालोआच्या उमेदवाराविरुद्ध एक सशक्त आणि सर्वसंमतीने एकच उमेदवार द्यायचा, असे कॉंग्रेसप्रणित संपुआचा विचार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना संपुआचा उमेदवार बनवायचे अशी एक चर्चा होती. परंतु, या दिशेने काही तरी प्रयत्न होत आहेत असे सध्यातरी दिसून येत नाही.
जूनच्या मध्यात अर्थात एका महिन्याने निवडणुकीची अधिसूचना निघण्याची शक्यता आहे; परंतु कॉंग्रेस आणि मित्र पक्षांकडून कोणत्याही प्रकारची हालचाल होताना दिसत नाही. एवढंच काय तर, कॉंग्रेस आणि राकॉंमध्ये का-कूं सुरू आहे. अशातच, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी विरोधकाच्या उमेदवारासाठी समर्थन मिळविण्यासाठी भेठीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. बीजदला संपुआच्या बाजूने आणण्यासाठी राव यांनी पक्षाच्या नेत्यांना कामी लावले आहे.
आतापर्यंतचा इतिहास बघितला, तर बीजदने वेळोवेळी भाजप सरकारला संसदेत मदत केली आहे. मोदी सरकारने 2019 मध्ये जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक आणि ट्रिपल तलाक विधेयक संसदेत मांडले तेव्हा बीजदने सरकारच्या बाजूने मतदान केले होते. तरीसुद्धा, राष्ट्रपतींच्या निवडणुकीत नवीन पटनायक आपल्याला सहकार्य करतील, असे संपुआच्या नेत्यांना वाटत आहे. जगनमोहन रेड्डी मात्र रालोआच्या बाजूने दिसून येत आहेत.
राष्ट्रपतीच्या निवडणुकीत एका खासदाराच्या मताचे मूल्य 708 आहे. देशात 4,120 आमदार आहेत. राज्यांची लोकसंख्या लक्षात घेता आमदारांच्या मतांचे मूल्य वेगवेगळे आहे. उत्तर प्रदेशातील आमदारांचे मूल्य सर्वात जास्त 208 आहे. 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने बघितलं तर राष्ट्रपतीच्या निवडणूक विरोधकांच्या एकजुटीच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. भाजपला तगडे आव्हान देण्याची हुकमी संधी विरोधकांकडे आहे. भाजपने शिवसेना, अकाली दल आणि तेलगु देसम पक्षासारखे मित्र गमाविले आहेत. अशात आकड्यांचा खेळ विरोधकांच्या पथ्यावर पडतो की आणखी काही घडते? हे भविष्यात कळेलच.
कॉंग्रेसनुसार, संयुक्त पुरोगामी आघाडीला 13 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. यासाठी संपुआतील पक्षांची दाढी कुरवाळली जात आहे. कॉंग्रेसला छत्तीसगड आणि राजस्थानमधून प्रत्येकी दोन, तसेच हरियाणा, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, झारखंड, बिहार आणि मध्यप्रदेशातून प्रत्येक एक-एक खासदार निवडून येण्याची आशा आहे.
सुनील जाखड यांनी कॉंग्रेसला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हार्दिक पटेल यांनीही कॉंग्रेस पक्ष सोडला आहे. हरियाणाचे बिश्नोई यांनी भाजप नेत्यांची उघडपणे भेट घेतली आहे. याशिवाय, जी-23 गटाचे नेते आहेत. राज्यसभा ज्यांना मिळणार नाही त्यातील बहुतांश कॉंग्रेस सोडायला वेळ लावणार नाही, अशी चर्चा आहे.
राजस्थानच्या उदयपूर येथील चिंतन शिबिरानंतर कॉंग्रेसच्या मुख्यालयात आणखी एक “चिंतन शिबिर’ नुकतेच संपन्न झाले. यात सर्व महासचिव आणि राज्यांच्या प्रभारींना बोलाविण्यात आले होते. मात्र, यात उदयपूरमध्ये ठरलेल्या मुद्द्यांची अंमलबजावणीवर चर्चा झाली. राज्यसभेच्या उमेदवारीच्या मुद्द्यावर अद्याप चर्चा झाली नसल्याची चर्चा आहे. याशिवाय, गुजरात आणि हिमाचलमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या तयारीबाबतही कॉंग्रेसमध्ये सध्यातरी उदासीनता दिसून येत आहे.