पुणे – मे महिना मध्यावर येताच देशभरात अनेक ठिकाणी आर्द्रतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे उकाडा वाढला असला, तरी मान्सूनपूर्व पाऊस म्हणजे वळिवासाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचा अभ्यासकांचा दावा आहे. दरम्यान, मान्सून म्हणजेच मोसमी वारे अंदमानात दाखल झाल्याने वरील दाव्यांना पुष्टी मिळत आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
दक्षिण-मध्य कर्नाटकवरील चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे व अरबी समुद्रावरून येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे पुढील 5 दिवस तामिळनाडू, कर्नाटक किनारपट्टी, केरळ व महाराष्ट्राच्या अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. याचबरोबर उत्तर व मध्य भारतातील काही भागांत उष्ण लाटांचीही शक्यता आहे.
दुसऱ्या बाजूला मोसमपूर्व पावसासाठी महाराष्ट्र, केरळ, तामीळनाडू या राज्यांत अनेक भागांत ढगाळ वातावरण असल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे. दरम्यान, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. याशिवाय विदर्भामध्येही ढगाळ वातावरण आहे.
गारांच्या पावसाची शक्यता
उत्तरेकडील डोंगरी राज्ये जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत गारांच्या पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात पुढील दोन दिवस धुळीचे वादळ उठण्याची शक्यता आहे. यामुळे तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात होऊन गार वारे वाहण्याचा अंदाज आहे.
आर्द्रता म्हणजे काय?
आर्द्रता म्हणजे दमट ओलावा. हवेमध्ये नेहमीच अल्पप्रमाणात वायू स्वरुपातील जाणवण्याजोगे पाणी म्हणजे बाष्प असते. त्या हवेला आर्द्र हवा म्हणतात. आर्द्रतेचे प्रमाण वाढले म्हणजे हवा दमट झाली असे आपण म्हणतो. दमट, उष्ण हवामानात हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक असते. यावरच वृष्टी व पाऊस अवलंबून असतो. आर्द्रता नसलेली हवा कोरडी असते. मानवी जीवनासाठीही आर्द्रता महत्त्वाची ठरते.