आगरतळा – त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्रिपुरातील भाजपचे अनेक आमदार बिप्लब देब यांच्यावर नाराज होते. याची माहिती पक्ष हायकमांडपर्यंत पोहोचली होती. यानंतर हायकमांडने बिप्लब देब यांना राजीनामा देण्यास सांगितले होते.
राजीनामा सादर केल्यानंतर बिप्लब देब म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो आहे. मी गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली. मला राजीनामा द्यायला सांगितल्यावर मी तो दिला. पुढील वर्षी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत मी सहभागी होणार आहे. भाजपचा कार्यकर्ता या नात्याने मी पक्ष मजबूत करण्यासाठी सतत काम करत राहणार आहे.
त्रिपुरामध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान, राज्यात तृणमूल कॉंग्रेसही जोरदार सक्रिय दिसत आहे. अशा स्थितीत निवडणुकीपूर्वी पक्ष मजबूत करण्यासाठी भाजपने राज्याची कमान नव्या चेहऱ्याकडे सोपवण्याचा पवित्रा घेतल्याचे मानले जात आहे.
बिप्लब कुमार देब यांच्या राजीनाम्यानंतर, भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव म्हणाले, बिप्लब देव यांच्या नेतृत्वाखाली त्रिपुरात गेल्या चार वर्षात स्थिरता, शासन, प्रशासन आणि विकासाच्या बाबतीत खूप चांगले कार्य झाले आहे. देब यांनी त्रिपुरामध्ये सरकार स्थापन करण्यापूर्वी पक्ष संघटनेत प्रभावी योगदान दिले होते. पक्षाच्या संघटनात्मक कार्यात आपली भूमिका वाढवण्यासाठी आज मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी राज्यपालांना राजीनामा पत्र सुपूर्द केले आहे.