नगर -उन्हाची काहिली वाढत असतानाच, महावितरणकडून वीजकपात सुरू आहे. या निर्धारित वीजकपातीने नगरकर त्रस्त असतानाच महावितरणने आता अतिरिक्त वीजकपातीचा शॉक दिला आहे. ऐन उन्हाळ्यात वीज नसल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून उकाड्यात रात्र जागून काढण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
मध्यवर्ती शहरासह उपनगरात अचानक वीज गुल होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. दिवसा आणि रात्री अशा दोन टप्प्यात अडीच ते पात तासांची वीज कपात करण्याचे वेळापत्रक महावितरणकडून जारी करण्यात आलेले आहे. मात्र, वीज कपातीच्या ठरवून दिलेल्या वेळेपेक्षाही अधिक वेळ वीज जात आहे. त्यामुळे व्यावसायिकांसह सर्वांचीच मोठी तारांबळ उडत आहे. केडगाव, सावेडी भागात गुरूवारी रात्री विजेचा लपंडाव सुरू होता. वीज पुरवठा सुरळीत नसल्याने शहरातील अनेक अपार्टमेंट, इमारतींच्या टाक्यांमध्ये पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहेत. उन्हाच्या झळा वाढत असतानाच पंखा बंद असल्याने नागरिकांची घालमेल होत आहे. मोबाइल, लॅपटॉप चार्ज नसल्याने तसेच इंटरनेट सेवा बंद पडत असल्याने नोकरदार वैतागले आहे.
वीज कपातीने लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहराच्या विविध भागांत विजेचा लपंडाव सुरू आहे. कोळसा टंचाईमुळे सध्या राज्यात भारनियमन सुरू असले तरी गेल्या अनेक महिन्यांपासून शहराच्या विविध भागात वीजपुरवठा विस्कळीत होत असल्याची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. अचानक रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होते.
अगोदरच विस्कळीत पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात आणखीच वीज कपातीचे भर पडले आहे. शहरासह उपनगरातील अनेक भागात नेमके पाणी सुटण्याच्या वेळेस वीज जात आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावू लागला आहे. वीज नसल्याने अपार्टमेंट व इमारतीमधील टाक्यामध्ये पाणी पोहोचत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना पाणी भरण्यासाठी मध्यरात्री, पहाटे जागे रहावे लागत आहेत.