पिंपरी – नवीन शिधापत्रिका मिळूनही धान्य मिळत नसल्याबद्दल शासनास तक्रारी प्राप्त होत असतात. शिधापत्रिकेची ऑनलाइन नोंदणी होऊन 12 अंकी क्रमांक प्राप्त झाल्यानंतर धान्य वाटपाची कार्यवाही करण्यात येते. 12 अंकी क्रमांक शिधापत्रिकेवर नमूद करूनच लाभार्थ्यास शिधापत्रिका देण्यात याव्यात, अशा सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत.
आत्तापर्यंत अंत्योदय, अन्नसुरक्षा योजनेतील चिंचवड आणि पिंपरी विभागातंर्गत येणाऱ्या एकूण 77 हजार 312 कार्डची ऑनलाइन नोंदणी झालेली आहे. त्या अंतर्गत 3 लाख 13 हजार 192 लाभार्थ्यांना धान्य दिले जात आहे. त्यांना 12 अंकी क्रमांक देण्यात आलेला आहे. केशरी कार्डधारक असलेल्या चिंचवड आणि पिंपरी विभागातंर्गत एकूण 1 लाख 30 हजार 269 केशरी कार्डधारक येतात. त्या अंतर्गत 4 लाख 20 हजार 178 लाभार्थी येतात. शिधापत्रिकेची ऑनलाइन नोंदणी होऊन 12 अंकी क्रमांक प्राप्त झाल्याशिवाय लाभार्थ्यास शिधापत्रिका देण्यात येऊ नये, असे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार कार्यवाही केली जात असल्याची माहिती निगडी येथील शिधापत्रिका कार्यालयाचे परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांनी दिली.
———————-