मुंबई – केंद्रातील मोदी सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच पुन्हा दररोज इंधन दरवाढ केली जात आहे. सर्वसामान्यांना त्रस्त करणा-या महागाईविरोधात आवाज बुलंद करत झोपी गेलेल्या केंद्रातील भाजप सरकारला सरकारला जागे करण्यासाठी 31 मार्चपासून राज्यभर “महागाईमुक्त भारत’ आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
नाना पटोले म्हणाले की, गरज सरो, वैद्य मरो या म्हणीसारखा भाजपाचा कारभार आहे. निवडणुकीत जनतेच्या रोषाला सामारे जायला नको म्हणून इंधन दरवाढ रोखून धरली आणि निवडणुका संपल्या मते घेतली निवडणून आले आणि लगेचच जनतेवर महागाईचा भार टाकण्यास सुरुवात केली आहे.
मागील पाच दिवसात पेट्रोल, डिझेल 3.20 रुपये प्रति लिटर महाग झाले आहे. तसेच एलपीजी गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाला आहे. सीएनजी, पीएनजी गॅस तसेच खाद्यतेलाचे दरही वाढले असून 1 एप्रिलपासून औषधांचे दरही वाढणार आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जनतेला महागाईच्या खाईत लोटत असून त्याबद्दल त्यांना काहीही वाटत नाही, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
मोदी सरकारच्या या निर्णयाचे चटके देशातील जनता भोगत असून केंद्र सरकारला जागे करण्यासाठी 31 मार्च रोजी कॉंग्रेस कार्यकर्ते आंदोलन करतील. तर 2 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान सर्व जिल्हा मुख्यालयाम महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चा आयोजित केला आहे. तर 7 एप्रिल रोजी राज्य मुख्यालयी मुंबईत महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चाचे आयोजन केले आहे.