पुणे –गेल्या दोन वर्षापासून ऑनलाइन वर्गामुळे घरामध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना आता शाळेतील मोकळ्या वातावरणात भरारी घेता येणार आहे. कधी ऑफलाइन, कधी ऑनलाइन भरणारे इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यास शालेय शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. आता शाळांमध्ये 100 टक्के विद्यार्थी उपस्थित राहण्यास मुभा देण्यात आली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शाळा पूर्ण क्षमतेने सुरू राहणार असल्याचा शासन निर्णय गुरूवारी प्रसिद्ध केला. गेली दोन वर्ष करोनामुळे ऑनलाइन पद्धतीने सुरू होती. त्यानंतर मध्यंतरी करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळा स्थानिक परिस्थितीचा विचार करून सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. त्यासंबंधीचे अधिकार संबंधित जिल्ह्यातील प्राधिकरण अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यानुसार ऑफलाइन, ऑनलाइन पद्धतीने शाळांचे वर्ग सुरू होते.
तथापि, करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यात करोना विषयक निर्बंध टप्प्याटप्प्याने उठविण्यात येत आहेत. तसेच करोनामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी या शैक्षणिक वर्षात मार्चपासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात यावेत. एप्रिल महिन्यापर्यात शनिवारी पूर्णवेळ शाळा सुरू ठेवाव्यात. तसेच रविवारी ऐच्छिक स्वरुपात शाळा ठेवता येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद आहे.