नवी दिल्ली – भारताची क्षेपणास्त्र यंत्रणा अत्यंत विश्वासार्ह आहे आणि क्षेपणास्त्रांची सुरक्षा प्रक्रिया सर्वोच्च दर्जाच्या आहेत, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत केले.
भारताचे एक क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानी हद्दीत पडले त्या संबंधात संसदेत निवेदन करताना ते म्हणाले की, या प्रकरणात नेमक्या काय त्रुटी निर्माण झाल्या त्याची चौकशी करून त्यात त्वरित सुधारणा केली जाईल. 9 मार्च रोजी भारताचे एक क्षेपणास्त्र पाकिस्तानी हद्दीत पडले होते. त्या संबंधात त्यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन केले. त्यांनी म्हटले की संरक्षण मंत्रलयाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून त्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात येत आहेत.
या क्षेपणास्त्राच्या देखभालीचे आणि तपासणीचे काम सुरू असताना 9 मार्च रोजी अपघातानेच हे क्षेपणास्त्र शेजारील देशाच्या हद्दीत जाऊन पडले. तथापि, या प्रकारात कोणालाही दुखापत झाली नाही किंवा जीवितहानीही झाली नाही. ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. भारतीय सशस्त्र दल प्रशिक्षित आणि शिस्तप्रिय आहेत आणि अशा यंत्रणा हाताळण्यात त्यांना चांगला अनुभव आहे अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन्स, देखभाल आणि तपासणीसाठी मानक कार्यप्रणालीचा आढावा घेण्यात येत आहे. आम्ही आमच्या शस्त्र प्रणालीच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देतो. जर काही कमतरता असेल तर त्यात ताबडतोब दुरुस्ती केली जाईल.
भारताची क्षेपणास्त्र प्रणाली “अत्यंत विश्वसनीय आणि सुरक्षित” आहे त्यामुळे अशा काही घटनांमुळे त्या बाबतीत चिंता करण्याचे कारण नाही. भारतातून चुकून सुटलेले हे क्षेपणास्त्र पाकिस्तानी हद्दीत 124 किमी आत खानेवाल जिल्ह्यांतील मियॉं चन्नू गावाजवळ पडले.