मुंबई – रशिया- युक्रेन युद्धामुळे निर्देशांकाची मोठी हानी झाली आहे. मात्र बुधवारी जागतिक बाजारातून काही प्रमाणात सकारात्मक संदेश आले. त्याचबरोबर एक्झिट पोलमध्ये भाजप उत्तर प्रदेशात जिंकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे सुखावलेल्या गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक दोन टक्क्यांनी वाढले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 1,223 अंकांनी म्हणजे 2.29 टक्क्यांनी वाढून 54,647 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी तब्बल 331 अंकांनी म्हणजे दोन टक्क्यांनी वाढून 16,345 अंकांवर बंद झाला.
मात्र या खरेदीच्या वातावरणातही पावर ग्रिड, एनटीपीसी, टाटा स्टील, नेस्ले या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार घट झाली. लवकरच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे नागरी विमान वाहतूक कंपन्यांच्या शेअरच्या भावामध्ये आज मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गेल्या दोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय विमानसेवावर परिणाम झाला होता. आता 27 मार्च रोजी ही सेवा सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. आगामी काळातही या कंपन्यांचे शेअर वाढण्याची शक्यता आहे.
भारतीय कंपन्यांची एकूण परिस्थिती पाहता या कंपन्यांच्या शेअरचे भाव सध्या बऱ्याच कमी पातळीवर आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार खरेदी करण्याची संधी शोधत असल्याचे दिसून येते असे जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले.
मात्र शेअर बाजार निर्देशांकामध्ये भरीव वाढ झाली असली तरी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा मारा चालू आहे. युद्ध आणि अमेरिकेची व्याजदरवाढ याला कारण आहे. काल या गुंतवणूकदारांनी तब्बल 8,142 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. या गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक 18 टक्के इतकी असल्याचे मानले जाते. ही गुंतवणूक थांबविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.