हेळगाव – शेतात पाणी पाजताना विजेचा शॉक लागून हेळगाव, ता. कराड विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सुनील शंकरराव पाटील (वय 52) यांचा गुरुवारी (दि. 3) सकाळी मृत्यू झाला. त्यांचे चुलते किसन पाटील हेदेखील शॉक लागून जखमी झाले, तर अन्य दोघे बचावले आहेत. महावितरणच्या गचाळ कारभारामुळे ही दुर्घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुनील पाटील हे काल आपल्या शेतात पिकांना पाणी द्यायला गेले होते. त्यावेळी शेतातील विजेच्या खांबावरील बंद तार तुटून विद्युतप्रवाह सुरू असलेल्या तारेवर पडल्याने शेतातील पाण्यात वीजप्रवाह सुरू झाला. सुनील पाटील हे पाणी पाजत असताना, विजेच्या तीव्र धक्क्याने ते जागीच मृत्युमुखी पडले. त्यांना शोधायला गेलेले त्यांचे चुलते किसन गणपती पाटील यांनाही विजेचा शॉक लागून ते जखमी झाले आहेत.
सुनील यांच्या पत्नी नंदा व चुलत बंधू अनिल यांनी प्रसंगावधान राखल्याने बचावले. या घटनेची फिर्याद मसूर पोलीस दूरक्षेत्रात नोंदवण्यात आली आहे. सुनील पाटील हे सोज्वळ व हसतमुख होते. ते परिसरात भाऊ म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे, आई, वडील असा परिवार आहे. त्यांच्यावर गुरुवारी रात्री उशिरा हेळगावातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
…तर घटना घडलीच नसती
सुनील पाटील यांच्या शेतातील खांबावरून रस्त्यापलीकडील खांबावर एक विजेची तार बऱ्याच दिवसांपासून टाकण्यात आली होती. ती तार काढण्यासाठी पाटील यांनी महावितरणला तोंडी व लेखी कळवले होते; परंतु महावितरणने दखल न घेतल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे महावितरणच्या कारभाराचा निषेध करण्यात येत आहे.