जालना – जालना शहरातील यशवंत नगर येथून 2 फेब्रुवारीपासून बेपत्ता झालेले अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे यांचा शोध लागला आहे. ताटे सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथे पोलिसांना आढळून आले आहेत. दरम्यान त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना शिरवळ येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
2 तारखेला संग्राम ताटे हे पत्नीला मित्राकडे जातो म्हणून निघून गेले होते. त्यानंतर ते घरी फिरकले नाहीत. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी आपले दोन्ही मोबाईल आणि पैशाचे पॉकेट घरीच ठेवले होते. या प्रकरणी त्यांच्या पत्नीने शहरातील कदिम पोलीस ठाण्यात मिसींगची केस दाखल केली होती. त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून जालना पोलिसांनी त्यांच्या शोधात तीन पथके तयार केली होती. दरम्यान काल रात्री ते सातारा जिल्ह्यातील खंडाळ्यामधील महामार्गावरील जुन्या टोलनाक्याजवळ आढळून आले.
तपास सुरु असताना पोलिसांना घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर एक cctv फुटेज भेटले होते. सुरवातीला एका रिक्षाने या शहरातील मोतीतलाव भागात आले जिथून एक लाल रंगाच्या गाडीमधून ते औरंगाबादच्या दिशेने गेल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र आज तब्बल 13 दिवसांनी ताटे हे खंडाळ्यात आढळून आले आहेत. आता त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. त्यांना जालन्यात परत आणल्यानंतर नेमके काय घडले होते याबाबत अधिकची माहिती कळू शकणार आहे.