हडपसर – सोलापूर महामार्गावर हडपसर येथे असलेला मुख्य उड्डाणपुल बेरींग खराब झाल्याने तसेच पुलाला तडे गेल्याने खराब झाला आहे. अवघ्या 18 ते 19 वर्षात हा पूल खराब कसा झाला? पुलाचे कामच निकृष्ट दर्जाचे झाले आहे काय? पूल खराब झाल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे रात्रंदिवस येथे वाहतूक कोंडी होत आहे.
त्यामुळे पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार व कामाची पाहणी करणारे संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करावी ,अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिला आहे.
उड्डाण पूल वाहतुकीस बंद असल्याने रुग्णांना घेऊन जाणाऱ्या सणवाहिका, कामगारांच्या बस, स्कुल बस आणि सर्वच प्रवाशी – नागरिक या वाहतूक कोंडीत तासनतास अडकून पडत आहेत. इतक्या कमी कालावधीत मुळात पूल खराब कसा झाला असा सवालही शेवाळे यांनी उपस्थित केला आहे.
याचे कारण शोधून संबंधित अधिकारी, ठेकेदार यांच्यावर गुन्हे नोंद करायला हवेत. याशिवाय पूल वाहतुकीस बंद करण्यापूर्वी सक्षम अशी पर्यायी व्यवस्था करायला हवी होती, मात्र तसे करण्यात आले नाही. अचानक पुल बंद केल्याने, आज हजारो नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे प्रशासन नेमके काय करत आहे. हेच कळत नाही. प्रशासनाच्या या हलगर्जी पणामुळे नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. यामागे हा पुल पाडण्याचा डाव असून, नव्याने करोडो रुपये खर्च करून त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारत येत नाही. नागरिकांच्या टॅक्स मधून येणाऱ्या पैशाचा दुरुपयोग केला जातो आहे.
सदर पुल दुचाकी व हलक्या चारचाकी वाहनासाठी ताबडतोब खुला करण्यात यावा तसेच मोठ्या वाहनांसाठी पर्यायी मार्गाचा वापर सुरू करून पुलाची येत्या पंधरा दिवसात दुरुस्ती करून नागरिकांसाठी खुला करावा. अशी मागणी राहुल शेवाळे यांनी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे तसेच महानगरपालिका मुख्य अभियंता (स्थापत्य) श्रीनिवास बोनाला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावर कार्यवाही न झाल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही शेवाळे यांनी दिला आहे.