नवी दिल्ली -विधानसभा निवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या पाच राज्यांमध्ये बेहिशेबी रोकड आणि इतर मुद्देमालाच्या जप्तीची कारवाई सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून होणाऱ्या त्या कारवाईत आतापर्यंत 240 कोटी रूपये किमतीच्या रोकड आणि इतर मुद्देमालाची जप्ती झाली आहे.
निवडणुकांच्या काळात मतदारांना आमीष म्हणून रोकड, मद्य, अंमली पदार्थ, मौल्यवान वस्तू देण्याचे प्रकार घडतात. त्यांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध यंत्रणांचा समावेश असणारी पथके स्थापन केली जातात. तशा पथकांनी आता उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये कारवाई सत्र हाती घेतले आहे.
त्यातून उत्तरप्रदेशातून सर्वांधिक 19 कोटी रूपयांची रोकड आणि 16 कोटी रूपयांचे मद्य हस्तगत करण्यात आले. पंजाबमध्ये सर्वांधिक 75 कोटी रूपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले. त्याखालोखाल मणिपूरमध्ये 65 कोटींहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांची जप्ती झाली. पंजाबमध्ये आतापर्यंत 17 कोटी रूपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. उत्तराखंड आणि गोव्यातूनही विविध प्रकारची जप्ती झाली आहे.