मुंबई – 1996 साली झालेल्या बाल हत्याकांड प्रकरणातील कोल्हापूर येथील दोन बहिणींच्या शिक्षेचा आज फैसला झाला. गावित बहिणींना न्यायालयाने अखेर जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी रेणुका शिंदे व सीमा गावित या बहिणींची फाशी विलंबाच्या कारणास्तव जन्मठेपेत रूपांतर होणार की नाही या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालवर सर्वांचे लक्ष लागून होते. या प्रकरणी न्यायालयाने आज आपला निर्णय सुनावला आहे.
या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणी अंती या प्रकरणाचा निकाल 18 डिसेंबर 2021ला खंडपीठाने निकाल राखून ठेवला होता.
कोल्हापुरात 1996 साली गावित बहिणींच्या बाल हत्याकांड प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होवून गावित बहिणींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, त्या शिक्षेवर अद्याप अंमलबजावणी झाली नव्हती. फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला विलंब झाल्याचे कारण देत त्यांच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करावे, अशी मागणी गावित बहिणींचे वकील ऍड. अनिकेत वगळ यांच्याकडून करण्यात आली होती.
1996 साली कोल्हापुरात 40 पेक्षा जास्त लहान मुलांचे अपहरण करुन त्यापैकी 5 लहान मुलांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास केला असता कोल्हापूरच्या रेणुका शिंदे आणि सीमा गावित या बहिणींना या गुन्ह्यांत अटक करण्यात आली. तपासात ज्या धक्कादायक गोष्टी समोर आल्या त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले होते.
या बहीणींनी त्यांच्या आईसोबत मिळून क्रूरपणे 5 मुलांची हत्या केल्याचे तपासात समोर आले. या दोघींची आई अंजना हिला देखील या प्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र, कारागृहामध्येच तिचा मृत्यू झाला. दरम्यान सुरु असलेल्या खटल्यात दोघी बहिणी दोषी आढळल्याने कोल्हापूर न्यायालयाने 2001मध्ये गावित बहिणींना दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती.