मुंबई- राज्यात 54 दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपात फूट पडल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी एसटी संपातून माघार घेतली आहे. परिवहनमंत्री अनिल परब आणि अजयकुमार गुजर यांच्यात आज प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी संप मागे घेतल्याचे जाहीर केले. मात्र, आझाद मैदान आणि अन्य एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत.
अजयकुमार गुजर म्हणाले, आम्ही संप पुकारला होता. तो आज झालेल्या बैठकीनंतर आम्ही मागे घेत आहोत. एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाचा लढा न्यायालयावर सोपवलेलाआहे. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल.
राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की, सर्व कर्मचाऱ्यांनी आपण पुकारलेला लढा चर्चा केल्याप्रमाणे आता थांबवत आहोत. 22 डिसेंबरपर्यंत तुम्ही कामावर हजर व्हा. आपल्यावरील कारवाई मागे घेण्याची विनंती आम्ही केली आहे, असे त्यांनी सांगितले.
कारवाई मागे घेणार – परब
ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, ते कर्मचारी जर कामावर पुन्हा रुजू झाले तर त्यांच्यावरची कारवाई मागे घेतली जाईल. तसेच त्यांच्यावरील फौजदारी गुन्हे ज्यांच्यावर दाखल झाले आहेत, त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कारवाई मागे घेण्यात येईल, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.