महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आदिशक्ती अभियानाचा प्रारंभ महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी महिला व बालविकास मंञी श्रीमती यशोमती ठाकुर , महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा अॕड.श्रीमती निर्मला सामंत प्रभावळकर ,विधान परिषदेच्या सदस्या प्रा.डॉ.श्रीमती मनीषा कायंदे यांची देखील उपस्थिती होती.
रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर या अभियानाच्या आरंभ समारोहाचा दिमाखदार कार्यक्रम बांद्रा मुंबई येथील रंगशारदा सभागृह येथे पार पडला. आगामी वर्षात सार्वजानिक , कामाच्या ठिकाणी तसेच घरी होणारे अत्याचार , बालविवाह , कोरोना एकल महिला , महिला नेतृत्व विकसन या विविध मुद्द्यांवर या अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबविणार असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या महिना भरापासून महाराष्ट्रभर दिसून आलेल्या महिलांच्या समस्या आणि त्यावरील आयोगाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या उपाययोजना याने रुपाली चाकणकर यांनी सर्व उपस्थित मान्यवर आणि सदस्यांची मने जिंकली.
शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कंपन्यांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन केली नसेल तर त्यासाठी ५० हजार दंड आहेच तसेच ती कंपनी सील करावी असा प्रस्ताव महिला आयोगाने मांडल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील बाल विवाहांची उदाहरण देत महाराष्ट्राला आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच ज्या ग्रामपंचायत मध्ये बालविवाह होईल तिथे सरपंच व विवाह रजिस्टर करणारे यांची पदे रद्द करावी अशीही शिफारस राज्य महिला आयोगाकडून केल्याचे त्यांनी सांगितले.
तृतीय पंथीयांना स्वतंत्र वॉर्ड असावा अशी मागणी काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयात केली असता पुढील काही दिवसांमध्ये तिथे तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड होत असल्याचे देखील त्यांनी यावेळी प्रतिपादन केले. व त्या स्वतः उद्घाटन प्रसंगी उपस्थित असतील असेही त्यांनी सांगितले. १६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भया प्रकरण घडले. अशी प्रकरण घडू नयेत ही खरी निर्भयाला श्रद्धांजली राहील. व हे सांगताना पुढील हिवाळी अधिवेशनात शक्ती कायदा मंजूर करून घ्यावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. त्यासाठी अलीकडेच हिंगणघाट मध्ये घडलेल्या सामूहिक बलात्काराचे उदाहरण देऊन महिलांना आपण सुरक्षित आहोत असे वाटावे यासाठी हा कायदा गरजेचा असल्याचं त्या बोलल्या.
सोबतच पावसाने झोडपले तर सरकार आहे आणि नवऱ्याने मारले तर महिला आयोग आपल्यासोबत आहे असाही विश्वास देत महिलांनी भरोसा सेलची मदत कौटुंबिक अत्याचारावेळी घ्यावी असेही आवाहन चाकणकर यांनी केले. यासोबतच फक्त कायदा असून उपयोग नाही तर आता पुरुषांना देखील आपला दृष्टिकोन बदलावा लागेल त्यासाठी पुरुषांवर देखील संस्कार करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही “आदिशक्ती” या महिला आयोगाच्या उपक्रमाचे आणि रुपाली चाकणकर यांचे कौतुक केले. महाराष्ट्र शासन मुली आणि महिलांच्या विकासासाठी कटिबद्ध असून महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला ‘शक्ती’ कायदा विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात मंजूर केला जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.”पहिले व एकुलते अपत्य असलेली आमची कन्या हीच आमची परंपरा व सामाजिक वसा पुढे नेईल हा दृढ विश्वास आहे. तिलाही सामाजिक काम करताना आनंद मिळतो, ही समाधानाची बाब आहे.” असेही यावेळी ते बोलले.
आदिशक्ती अभियानाचा एक भाग म्हणून यावेळी महिलांची सुरक्षा : काल , आज आणि उद्या या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता यामध्ये हावरे ऊद्योग समुहाच्या अध्यक्षा ऊज्वला हावरे , उच्च न्यायालयाच्या वकिल आणि महिलाविषयी उल्लेखनीय काम करणाऱ्या आणि कायदेशीर सल्लागार अॕड. श्रीमती दिव्या चव्हाण , प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ व घरगुती हिंसा व त्याची कारणे या विषयातील तज्ञ समुपदेशक श्रीमती शिरीषा साठे , श्रीमती कल्पिता पिंपळे ,सहाय्यक आयुक्त महानगरपालिका ठाणे , पुर्णब्रम्ह ऊद्योग समूहाच्या श्रीमती जयंती कठाळे , स्नेहालय संस्थेच्या समन्वयक श्रीमती शुभांगी रोहकाळे सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका उत्तरा मोने यांनी यांनी केले तर आभार प्रदर्शन राज्य महिला आयोगाच्या प्रशासकीय अधिकारी दीपा ठाकूर यांनी केले.