नऱ्हे –पुणे महानगरपालिकेकडे घनकचरा, कचरा व्यवस्थापनासाठी मोठी आर्थिक तरतूद असताना चुकीच्या नियोजनामुळे नऱ्हे परिसरात कचराच कचरा चोहीकडे.., अशी स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-बेंगलोर महामार्गालगत तसेच अभिनव कॉलेज परिसर, स्वामी नारायण मंदिर ते नवले पुल सेवा रस्त्यावर मोठमोठे उकीरडे साचले आहेत. शहराचे प्रवेशद्वार असलेला परिसराच विद्रुप दिसत आहे.
केंद्र शासनाच्या “स्मार्ट सिटी’ योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या पुणे शहराचा विकास होत असताना उपनगरे मात्र “कचऱ्यात’च पडली असल्याचे नऱ्हे येथील स्थितीतून स्पष्ट होत आहे. महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी ग्रामपंचायतीकडून 8 गाड्या व 40 ते 45 कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे नऱ्हे गाव परिसरात कचरा व्यवस्थापन केले जात होते. परंतु, महापालिकेत समावेश झाल्यानंतर हे व्यवस्थापन कोलमडले आहे. नऱ्हे परिसरात कचरा गोळा करणाऱ्या पालिकेच्या गाड्या वेळेवर येत नसल्याने तसेच कचरा गोळा करण्याची वेळ उशीराची असल्याने ही यंत्रणाच कुचकामी ठरत आहे.
महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावरील पडलेला कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य निरीक्षकाला याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. नऱ्हे परिसरात सर्वत्र इतरत्र पडलेला कचरा तातडीने उचण्यात येईल. तसेच, कचरा संकलनाचे योग्य ते नियोजन केले जाईल. असे विद्रुपीकरण होणार नाही, याबाबत काळजी घेतली जाईल.
– संजीव ओव्हाळ, सहाय्यक आयुक्त, सिंहगड क्षेत्रीय कार्यालय